Supriya Sule : नवाब मलिकांनी वानखेडेंवर केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी
Supriya Sule : नवनीत राणा यांची वैयक्तिक मते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या बोलल्या ते योग्य नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे.
लातूर: ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (aryan khan) क्लिनचिट मिळाल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता वानखेडे यांचीच चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर (sameer wankhede) लावलेल्या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवाब मालिकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली. एवढे दिवस ते तुरुंगात आहेत हे दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. सुप्रिया सुळे या लातूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. भाजपाच्या विरोधातले सरकार जिथे जिथे आहे तिथे ईडी आणि इतर कारवाया केल्या जात आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच संभाजी छत्रपती यांनी घोडेबाजार थांबविण्यासाठी निवडणुकीपासून थांबायचा निर्णय घेतला आहे, त्याच स्वागत झालं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कानपिचक्याही दिल्या. नवनीत राणा यांची वैयक्तिक मते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या बोलल्या ते योग्य नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी देखील कधीच पंतप्रधानांबद्दल अपशब्द बोलत नाही. कारण मी भारताची नागरिक आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी नवनीत राणा यांना लगावला.
केंद्राची वेगवेगळी उत्तरं
विधवा महिलांना प्रवाहात आणून त्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्याबद्दलच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागतच आहे, असं त्या म्हणाल्या. ओबीसींच्या इम्पिरिकल डाटाबाबत केंद्र सरकारकडून वेगवेगळी उत्तरं येत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
आमचा भाऊ त्याबद्दल बोलतच नाही
भोंग्याबद्दल काय बोलावं? काढायला गेले भोंगे आणि निघाले दुसरेच भोंगे. शिर्डी-पंढरपूरचे भोंगे निघाले. आमचा भाऊ मात्र त्याबद्दल कधी बोलत नाही. पण नुकसान कुणाचं झालं? सगळ्यांचंच झालं, असा टोला त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
भगवान देता है तो
भगवान जब देता है तो छप्पर फाड के देता है. राज्यमंत्री संजय बनसोडे हे निवडून येतील की नाही याची चिंता होती. मात्र ते आमदार झाले आणि राज्यमंत्री सुद्धा झाले, असंही त्या म्हणाल्या.