Diva Water Supply : दिवा परिसराला वाढीव पाणी पुरवठा सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीत आदेश
दिवा परिसरामधील वाढती लोकसंख्या विचारात घेता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून सद्य:स्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत होता. त्यामुळे त्या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते.
ठाणे : दिवा परिसरामधील वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा (Water Supply) व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने बैठक घेऊन दिवा शहराला दैनंदिन 6.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे आदेश (Order) दिले होते. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करुन दिव्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपासून वाढीव पाणीपुरवठा देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे दिवावासियांना मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याने दिवावासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दिवावासीयांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते
दिवा परिसरामधील वाढती लोकसंख्या विचारात घेता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून सद्य:स्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत होता. त्यामुळे त्या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते. ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्याकरीता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र पाटक, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमारसिंह, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एन. बल्गन, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाढती लोकसंख्या विचारात घेता वाढीव पाणीपुरवठ्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
या बैठकीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. ठाणे शहराला होणारा अपुरा पाणीपुरवठा विचारात घेऊन, ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी तानसा आणि बारवी धरणातून 50 दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रतिदिन प्रक्रिया केलेले पाणी कोपरी व वागळे इस्टेट परिसराला उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच दिवा विभागासाठी पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी देखील भातसा धरणातून ठाणे महानगरपालिकेला 6.50 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका वाढीव पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने वितरीत करावा तसेच ठाणे महानगरपालिकेने स्वतःच्या योजनेतून 6.50 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना वागळे परिसराकरीता उपलब्ध करुन, त्या बदल्यात बार्टर पध्दतीने दिवा परिसराकरीता 6.50 दशलक्ष लिटर प्रतिदिन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाढीव पाणी पुरवठा त्वरीत करावा असा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला.
जलसंपदा विभागाकडून भातसा धरणातून 6.50 दशलक्ष लिटर प्रति दिन वाढीव पाणी पुरवठा त्वरीत सुरु करण्यात आला आहे. तसेच बार्टर पध्दतीने पाणी पुरवठा करण्याकरीता आवश्यक ती नळ जोडणी, मीटर बसविणे इ. कार्यवाही करुन, नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून 6.50 दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकरीता सुरु करण्यात आला आहे. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक अशोक वैती, एकनाथ भोईर, राम रेपाळे, शरद कणसे, रमाकांत मढवी आदी उपस्थित होते. (Chief Minister Eknath Shinde’s order to supply increased water to Diva area)