परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला मोठा फटका, केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत द्यावी : बाळासाहेब थोरात
यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसानेही होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मुंबई : परतीच्या पावसाचा मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (The Central Government should Financial Support To maharashtra Says Balasaheb Thorat)
“यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसानेही होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांची आवस्था अतिशय भीषण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी”, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
“केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील”, असंही थोरात म्हणाले.
“या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु”, असं थोरात म्हणाले.
राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. अतिवृष्टीमुळं 28 जणांना जीव गमवावा लागला. अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे.
(The Central Government should Financial Support To maharashtra Says Balasaheb Thorat)
संबंधित बातम्या
केंद्राचे काळे कायदे शेतकरी-कामगारांना वेठबिगार बनवून उद्ध्वस्त करणारे : बाळासाहेब थोरात
दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला