झुकले असते तर मिंध्ये, संजय राऊत खऱ्या अर्थानं जिंदे, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
ईडीला छळवाद करायचा आहे. त्यामुळं ते जामिनाविरोधात कोर्टात गेलेत.
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. यासंदर्भात बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, खूप खूप आनंद झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे राऊत हे निष्ठावंत व कडवट कार्यकर्ते आहेत. झुकेंगे नही, असं ते म्हणत होते. न्यायालयानं त्यांना जामीन दिला. याचा खूप आनंद झाला आहे. इतका छळवाद त्यांनी सहन केला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढ कमी आहे.
अनेक जण अशा छळवादामुळं तिकडं गेलीत. मिंध्ये झालीत. पण, संजय राऊत हे झुकले नाहीत. केंद्राच्या यंत्रणा या संविधानाला धक्का देणाऱ्या कृती करतात. एक स्तंभ जागा आहे. त्यांनी त्यांना न्याय दिला.
ईडीला छळवाद करायचा आहे. त्यामुळं ते जामिनाविरोधात कोर्टात गेलेत. न्यायालयानंही ईडीवर ताशेरे ओढले होते. शिवडी कोर्टात न्यायालयानं पोलिसांना विचारलं की, तुम्ही मॅनेज झालात का म्हणून. ही राज्य सरकारच्या कानशिलात बसली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना अटक करा, असे ताशेरे ओढले आहेत.
संजय राऊत यांच्याबाबतीतही न्यायालयानं ईडीवर ताशेरे ओढले आहेत. अन्याय करण्यासाठी खोट्यानाट्या गोष्टी कोर्टात सांगितल्या जातात. तेही जनतेला कळलं पाहिजे. मेहंदीवाल्याकडं ईडीवाले गेले होते. पोरीच्या लग्नाच्या विषयी चौकशी करण्यात आली. किती खाली चाललो आपण.
रोहित पवार यांनीही संजय राऊत यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला. कारण संजय राऊत हे महाविकास आघाडीची सरकार बनविण्यात महत्त्वाचा दुवा होते. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही आनंद असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं.