सरदार पटेल पुतळ्यावर गांधीजींचे पणतू म्हणतात…
सांगली : सरदार वल्लभभाई पटेल यांचा केवळ उंच पुतळा उभारण्यापेक्षा त्यांच्या नावाने सैनिक अकादमी उभी केली असती, तर अधिक चांगले झाले असते, असे मत गांधी फाऊंडेशनचे प्रमुख आणि गांधींजींचे पणतू तुषार गांधी यांनी मांडले. सांगलीत झालेल्या दुसऱ्या विचारमंथन संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. ‘कार्ल मार्क्स, गांधी आणि आंबेडकर यांचा राष्ट्रवाद’ या संकल्पनेवर आधारित […]
सांगली : सरदार वल्लभभाई पटेल यांचा केवळ उंच पुतळा उभारण्यापेक्षा त्यांच्या नावाने सैनिक अकादमी उभी केली असती, तर अधिक चांगले झाले असते, असे मत गांधी फाऊंडेशनचे प्रमुख आणि गांधींजींचे पणतू तुषार गांधी यांनी मांडले. सांगलीत झालेल्या दुसऱ्या विचारमंथन संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. ‘कार्ल मार्क्स, गांधी आणि आंबेडकर यांचा राष्ट्रवाद’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमानंतर तुषार गांधींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
धर्म आणि इतिहास यांचं विभाजन केले जात असून, त्यातून देशाला एकसंध ठेवता येणार नाही. प्रत्येकाच्या धर्माबद्दल एकमेकांनी आदर केला पाहिजे, असेही तुषार गांधी म्हणाले.
नोटबंदी आणि जीएसटी करप्रणाली हे दोन्ही निर्णय धक्कादायक आहेत. या निर्णयांचा सामान्य जनतेला काही फायदा झाला का याचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत मांडताना तुषार गांधी पुढे म्हणाले, “गाव उजाड पडली असून कार्पोरेट पद्धतीला बढावा दिला जात आहे. त्यातून नफेखोरी निर्माण होत आहे. बँकांची मोठी कर्ज घेतलेले काही उद्योगपती देशाबाहेर गडप होत आहे. सामान्य कर्जदार मात्र बँकांचा ससेमिरा सोसत आहेत.”
तसेच, गांधी-आंबेडकर यांच्या संबंधांवर बोलताना तुषार गांधी म्हणाले, “महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद होते. मात्र कसलेही वैमनस्य नव्हते.”
प्रमुख शहरांची नावे बदलण्याची सध्या सुरु असलेली मोहीम देशाच्या हिताची नाही. त्यातून समाजाच्या एका वर्गात चुकीचा संदेश जाणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे, अशी भीतीही तुषार गांधी यांनी व्यक्त केली.