पटोलेंना वक्तव्य करण्यासाठी परवाना देणाऱ्यांचे काय, केंद्रीय मंत्री भारती पवारांचा रोकडा सवाल!
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, राज्यातील प्रश्नांना समोर न जाता पळ काढण्यासाठी पटोले यांच्याकडून मोदींवर टीका केली जात आहे. मात्र, यातून नाना पटोले यांच्या बुद्धिमतेची दिवाळखोरी समोर आली आहे.
नाशिकः गेल्या आठ दिवसांपासून सगळीकडे एकाच नावाची जोरदार चर्चा पाहायला दिसतेय. ती म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. (Nana Patole) त्यांनी केलेल्या नाना वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या तरी कसलिही निवडणूक नसताना एकच हलकल्लोळ उडालाय. भाजपचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्रे फडणवीस, चंद्रकांत पाटील या साऱ्यांनीच नानांवर जोरदार टीका केली. इतकेच काय आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बुजुर्ग आणि जाणते नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही नानांना उपदेशाचे चार शब्द सुनावले. आता केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी पटोलेंना वक्तव्य करण्यासाठी परवाना देणाऱ्यांचे काय, म्हणत काँग्रेस श्रेष्ठीवर टीकेचे आसूड ओढलेत.
पटोलेंची दोन वादग्रस्त वक्तव्ये
पटोलेंनी दोन वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यातले पहिले म्हणजे, “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….” दुसरे वक्तव्य त्यांनी काल इगतपुरीमध्ये केले. ते म्हणाले, लोक भाजपवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले आहे, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील यांच्यावरही तोडसुख घेतले.
प्रसिद्धीच्या हव्यासाचा छंद
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, राज्यात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत खराब आहे. काँग्रेसला येत असलेल्या पराभवांमुळे पटोले यांना नैराश्य आले आहे. या नैराश्यातून ती अशी नाना वक्तव्ये करत आहेत. आता पराभवाच्या मानसिक धक्क्यातून सावरता – सावरता त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोदी दिसायला लागले आहेत. मात्र, वैयक्तिक टीका करणे ही आपल्या राज्याची आणि देशाची संस्कृती नाही. पटोले यांना प्रसिद्धीच्या हव्यासाचा नवीन छंद जडला दिसतोय. त्यातून ते अशी वक्तव्ये करत आहेत, असा समाचार त्यांनी घेतला.
गुन्हा दाखल का नाही?
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, राज्यातील प्रश्नांना समोर न जाता पळ काढण्यासाठी पटोले यांच्याकडून मोदींवर टीका केली जात आहे. मात्र, यातून नाना पटोले यांच्या बुद्धिमतेची दिवाळखोरी समोर आली आहे. पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. आमच्या नेत्यांना वेगळा न्याय, नाना पटोले यांना एक न्याय. पटोले यांना असे वक्तव्य करण्यासाठी परवाना काढणाऱ्यांचे काय, म्हणत त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!
Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी