वर्धाः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनंही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. वर्ध्यातही गृह विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांना आता कोविड सेंटरमध्ये पाठवले जाणार आहे. तसेच अशा लोकांवर गुन्हेसुद्धा दाखल केले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. संध्याकाळी सात वाजेपर्यंत आस्थापने उघडी राहणार आहेत. (Wardha Cases Will Be Filed Against Those Who Break The Rules Of Home Separation)
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केलीय. जिल्ह्यात मागील 15 दिवसांत 1690 कोरोना रुग्ण आढळले असून, 23 रुग्णांचा मृत्यू झालाय.
सौम्य आणि अति सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरातच विलगीकरणात ठेवले जाणार आहे. अशा रुग्णांकडून विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून गृह विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांना आता थेट कोविड सेंटरला पाठवत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
जिल्ह्यात सध्या जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी लागू केले आहे. यात जिल्ह्यातील आस्थापने संध्याकाळी सात वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. एवढंच नव्हे तर जिल्ह्याच्या शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक शिकवणी वर्गसुद्धा बंद ठेवण्यात आलेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, धार्मिक आणि सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले असून, वैवाहिक समारोहात केवळ 50 लोकांची परवानगी देण्यात आलीय. जिल्ह्यात सध्या 27 हॉटस्पॉट आहेत, यापैकी 12 हॉटस्पॉट केवळ वर्धा तालुक्यात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 12,352 कोरोनाबधित रुग्ण आढळले असून, 342 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्याच्या आठ तालुक्यात आतापर्यंत 1,37,579 लोकांची चाचणी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
जयंत पाटील यांच्यापाठोपाठ मुलालाही कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार
नाशिकमध्ये कडक निर्बंध तरीही रुग्णसंख्या कमी होईना, गेल्या 24 तासांत धक्कादायक रुग्णवाढ
Wardha Cases Will Be Filed Against Those Who Break The Rules Of Home Separation