दुष्काळाची दाहकता तीव्र; घरावरील टाकीतील 300 लिटर पाणी चोरीला
मालेगाव, नाशिक : राज्यभर उन्हाचा पारा वाढला आहे. पिण्याच्या पाण्याचं संकट गडद झालं आहे. गावागावात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे ही अवस्था असताना दुसरीकडे चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चोर-दरोडेखोर रोख रकमेसह मौल्यवान वस्तू चोरून नेत आहेतच, पण आता चक्क पिण्याच्या पाण्यावरही डल्ला मारला जात आहे. मनमाड शहरात तशी घटना उघड झाली आहे. मनमाडमधील […]
मालेगाव, नाशिक : राज्यभर उन्हाचा पारा वाढला आहे. पिण्याच्या पाण्याचं संकट गडद झालं आहे. गावागावात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे ही अवस्था असताना दुसरीकडे चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चोर-दरोडेखोर रोख रकमेसह मौल्यवान वस्तू चोरून नेत आहेतच, पण आता चक्क पिण्याच्या पाण्यावरही डल्ला मारला जात आहे. मनमाड शहरात तशी घटना उघड झाली आहे.
मनमाडमधील सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी पिण्यासाठी टाकीत साठवून ठेवलेल्या 300 लिटर पाण्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी आहिरे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मनमाड शहरात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पालिकेतर्फे 22 ते 25 दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याने, नागरिकांना महिनाभर पुरेल इतके पाणी साठवून ठेवावे लागते. विलास आहिरे यांनीही 300 लिटरच्या टाकीत पाणी भरुन ठेवलं होतं. मात्र चोरांनी हे पाणीच पळवून नेलं.
रात्रभर जागून पाणी भरावे लागते. त्यात पाणी चोरीला गेल्यामुळे, पुढे पाणी कुठून आणावे असा प्रश्न आहिरे कुटुंबाला आहे.
छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी चोरी गेल्याचे कळताच, परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच, शिवाय आपलेही पाणी चोरीला जाणार नाही ना? अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे.
जर जगात तिसरे महायुद्ध झाले तर पाण्यासाठी होईल असं म्हटलं जातं. सध्याची पाण्याची परिस्थिती पाहता त्या दिशेनेच वाटचाल सुरु आहे की काय, असा प्रश्न आहे.