शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार द्या, ‘सामना’ची बातमी दाखवत भाजपची आक्रमक मागणी
भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर, आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक पवित्र्याने केली.
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्ष भाजपने शेतकरी मदतीवरुन आक्रमक भूमिका घेतली. भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर, आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक पवित्र्याने केली.
उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याचीच आठवण भाजपने करुन देताना, ‘सामना’च्या बातमीच कात्रण पोस्टररुपात झळकावून, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली. पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.
ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम करत आहे, सामनात खूप आणि सभागृहात चूप अशी शिवसेनेची भूमिका आहे, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती, मग आता सरकार स्थापन होऊन महिना होऊन गेला, तरीही अद्याप शेतकऱ्यांना मदत का नाही? असा सवाल भाजपने केला.
उद्धव ठाकरे शब्द पाळतील अशी आशा – फडणवीस
दरम्यान, सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी मदतीची मागणी लावून धरली. “उद्धवजींना मी ओळखतो, ते आमच्यासोबत होते तेव्हापर्यंत ते शब्द पाळत होते. आता उद्धव ठाकरे शेतकरी मदतीची, 25 हजार हेक्टरी देण्याचा शब्द पाळतील अशी आशा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.