भिवंडीत चारमजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, पाच-सहा जण अडकल्याची भीती
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये चारमजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीला तडा गेल्यानंतर रहिवाशांना बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
भिवंडी : भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर भागात धोकादायक इमारत कोसळल्याची (Bhiwandi Building Collapse) दुर्दैवी घटना समोर आली आहे. चार मजली इमारतीला तडे गेल्यानंतर रहिवाशांची सुटका करतानाच इमारत पडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ढिगाराखाली पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शांतीनगर भागातील चार मजली इमारतीचा कॉलम शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हलू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. साडेनऊच्या सुमारास महापालिका कंट्रोल रुमला फोन गेल्यानंतर रहिवाशांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. त्याचवेळी सुमारास संपूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही इमारत केवळ सहा वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.
या दुर्घटनेत 28 वर्षीय शिराज अन्सारी आणि आकिब या दोघांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौघांना जिवंत बाहेर काढण्यात आलं असून जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफ टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहे.
Maharashtra: Rescue operations continue at the building collapse site in Bhiwandi. The incident has claimed lives of 2 people so far. pic.twitter.com/hSLXoVlmn5
— ANI (@ANI) August 24, 2019
इमारतीतून सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं, मात्र काही जण आपलं सामान आणण्यासाठी परवानगी न घेता पुन्हा आत गेले, त्यावेळी दुर्घटना घडली, असा दावा महापालिकेने केला आहे.
इमारत दुर्घटना घडली, तो परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे आणि आत पोहचण्याचा मार्ग अत्यंत चिंचोळा असल्यामुळे यंत्रसामुग्री, अॅम्ब्युलन्स पोहचण्यात अडथळे येत आहेत. एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्कालीन यंत्रणेचे जवान टिकाव आणि फावड्याने ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत.
काहीच दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी परिसरातील दाटीवाटीच्या भागात इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये 14 जणांना प्राण गमवावे लागले होते.