मुंबईत रस्त्यावरील 80 टक्के थंड पेय हानिकारक, महापालिकेचा अहवाल
मुंबई : मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. पारा वाढत असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरील तसेच रेल्वे स्टेशनवरील दुकानातून थंड पेय घेत आहेत. यामध्ये लिंबू सरबत, बर्फाचे गोळे, ऊसाचा रस यांचा समावेश आहे. मात्र हेच थंड पेय आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे. मुंबई महापालिकेने काही दुकानातून घेतलेल्या नमुन्यात लिंबू सरबत, […]
मुंबई : मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. पारा वाढत असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरील तसेच रेल्वे स्टेशनवरील दुकानातून थंड पेय घेत आहेत. यामध्ये लिंबू सरबत, बर्फाचे गोळे, ऊसाचा रस यांचा समावेश आहे. मात्र हेच थंड पेय आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे. मुंबई महापालिकेने काही दुकानातून घेतलेल्या नमुन्यात लिंबू सरबत, ऊसाचा रस, बर्फाचे गोळे यांचे नमुने 80 टक्क्यांपेक्षा अधिक अयोग्य आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कुर्ला स्टेशनवरील दूषित लिंबू सरबताचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर मुंबई महापालिकेने रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या दुकानातून थंड पदार्थांचे नमुने घेतले. यामध्ये 80 टक्केपेक्षा जास्त नमुने शरीरासाठी हानिकारक असल्याचे समोर आलं. पालिकेने दादर, चर्चगेट, सीएसटी, कुर्ला आणि मुंबई सेंट्रलच्या प्रमुख रेल्वे स्थानकांसह शहरातील 222 दुकानांचे निरीक्षण केले होते.
मुंबईत उन्हाचा कहर वाढत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात थंड पेयाची मागणी वाढत असल्याने रस्त्यावर अनेक थंड पेय विकली जात आहेत. पण यात वापरला जाणारा बर्फ मात्र घातक असल्याचं समोर आलं आहे. हा बर्फ खाल्ल्ल्याने काविळ, गॅस्ट्रोसारखे आजार होतात. कारण दुकानात वापरल्या जाणाऱ्या बर्फात दूषित पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे शरीरासाठी हा बर्फ घातक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी पदमजा केसकर यांनी सांगितलं.
महापालिकेच्या 596 नमुन्यांचा अहवाल
या नमुन्यांमध्ये 156 बर्फाचे नमुने होते. या बर्फाच्या नमुन्यात 15 योग्य, तर 141 अयोग्य होते. तसेच 204 लिंबू सरबत यांचा समावेश होता. यामध्ये 47 योग्य आणि 157 अयोग्य होते. ऊसाच्या रसाच्या 236 नमुन्यामध्येही 15 योग्य आणि 221 अयोग्य होते.