पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाख, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणार
मुंबई विद्यापीठाकडून राज्यातील पूरग्रस्त भागासाठी 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील महापुराचं पाणी (Kolhapur Sangli Flood) ओसरत असलं, तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर कायम आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. पूरपरस्थितीमुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी आणि जनजीवन पूर्ववत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य विद्यापीठ करणार आहे.
पूरग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत ठराव मांडण्यात आला.
सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपत विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाखांचं सहाय्य देण्याचे ठरवलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी विद्यापीठाने या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वह्या, पेन, प्रयोगशाळा साहित्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्यक्ष ठिकाणी भेटी देऊन आणि परिस्थितीचा अभ्यास करुन कोणत्या शैक्षणिक साहित्यांची गरज आहे याची पाहणी करण्यासाठी एका अभ्यासगटाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांनाही विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षामध्ये आवश्यक शैक्षणिक साहित्य जमा करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली.
राज्य सरकारसह सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, देवस्थानं, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट आणि सर्वसामान्य नागरिकही पूरग्रस्तांना मदत करत आहेत. चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील काही सेलिब्रिटींनीही मदतीचा हात पुढे केला आहे.