आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी अजून किती वाट पाहायची?
राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठकीही रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्यानं ही बैठक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या मदतीसंदर्भात चर्चा होणार होती. पण आता शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? हा प्रश्न विचारला जातोय
मुंबई: अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. पण गुरुवार पाठोपाठ आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न विरोधकांसह शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. (State cabinet meeting postpone till next week)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर पाहणी दौऱ्यावेळी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करुन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं आश्वासन महसूलमंत्री थोरात यांनी दिलं होतं. पण गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ही बैठक शुक्रवारी म्हणजे आज होणार असं सांगण्यात आलं. पण आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही आता आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय. अशास्थितीत अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी आठवडाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार होम क्वारंटाईन
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना ताप आल्यानं ते होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित राहू शकत नसल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहू शकतात अशी चर्चा काल सुरु होती. पण आता ही बैठकच आठवडाभरासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी अजून आठ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
संबंधित बातम्या:
राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9 ला माहिती
केंद्राने आधी राज्याच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत; बाळासाहेब थोरातांची मागणी
State cabinet meeting postpone till next week