बिहारच्या रणधुमाळीनंतर आता ‘या’ पाच राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजणार; राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी सुरू
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता पुढील वर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. (after bihar election all party ready to battle for Assembly elections in 5 states)
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता पुढील वर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. (after bihar election all party ready to battle for Assembly elections in 5 states)
या पाचही राज्यांपैकी काँग्रेस आणि भाजपची प्रत्येकी एका राज्यात सत्ता आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. तर केरळात डाव्यांची सत्ता आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
पश्चिम बंगाल
- विधानसभेचा कार्यकाळ: मे 2021 पर्यंत
- विधानसभेच्या एकूण जागा: 294
- सत्ताधारी पक्ष : तृणमूल काँग्रेस
- मुख्यमंत्री: ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गेल्या दहा वर्षापासून या राज्यात ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. 2016च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागा जिंकल्या होत्या. तर, काँग्रेसने 44 आणि डाव्यांनी 26 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजला केवळ तीनच जागेवर विजय मिळाला होता. इतरांना दहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
आसाम
- विधानसभेचा कार्यकाळ: मे 2021 पर्यंत
- विधानसभेच्या एकूण जागा: 126
- सत्ताधारी पक्ष : भाजप
- मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल
आसाममध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होतील. आसाममध्ये गेल्या पाच वर्षापासून एनडीएची सत्ता असून भाजप नेते सर्वानंद सोनोवाल राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 2016च्या निवडणुकीत भाजपने 60 जागा जिंकल्या होत्या. तर मित्र पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने 14 आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने 12 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने आसाममधील 122 जागांपैकी केवळ 26 जागांवर विजय मिळवला होता. तर बद्रुद्दीन अजमल यांच्या एयूआयडीएफ पार्टीने 74 जागा लढवून 13 जागा जिंकल्या होत्या. या ठिकाणी एका जागेवर अपक्ष निवडून आला होता.
केरळ
- विधानसभेचा कार्यकाळ: मे 2021 पर्यंत
- विधानसभेच्या एकूण जागा: 140
- सत्ताधारी पक्ष : सीपीआय (एम)च्या नेतृत्वातील एलडीएफ
- मुख्यमंत्री: पिनराई विजयन
केरळमध्ये सुद्धा एप्रिल-मेच्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटची सत्ता आहे. 2016च्या निवडणुकीत एलडीएफने 91 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने 47 जागांवर विजय मिळवला होता. इतरांना दोन जागांवर विजय मिळविता आला होता. (after bihar election all party ready to battle for Assembly elections in 5 states)
तामिळनाडू
- विधानसभेचा कार्यकाळ: मे 2021 पर्यंत
- विधानसभेच्या एकूण जागा: 234
- सत्ताधारी पक्ष : एआयडीएमके
- मुख्यमंत्री: ई. पलानीस्वामी
तामिळनाडूतही एप्रिलच्या सुमारास विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कळघम (एआयडीएमके)ची गेल्या दहा वर्षांपासून सत्ता आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत एआयडीएमकेने 136 जागांवर विजय मिळवला होता. तर विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेने 89 जागा मिळविल्या होत्या. या ठिकाणी इतरांनी 11 जागांवर विजय मिळविला होता. मात्र, अभिनेते कमल हसन यांनी राजकारणात केलेला प्रवेश आणि सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचे दिलेले संकेत यामुळे यंदा तामिळनाडूची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुद्दुचेरी
- विधानसभेचा कार्यकाळ: मे 2021 पर्यंत
- विधानसभेच्या एकूण जागा: 30
- सत्ताधारी पक्ष : काँग्रेस
- मुख्यमंत्री: व्ही. नारायणसामी
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता असून काँग्रेसने 2016च्या निवडणुकीत 21 जागा लढून 15 जागांवर विजय मिळवला होता. तर ऑल इंडिया एन आर काँग्रेसने 30 जागा लढवून आठ जागा जिंकल्या होत्या. इतरांना या निवडणुकीत केवळ सात जागा जिंकता आल्या होत्या.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 19 November 2020 https://t.co/1pBirtOStJ #Maharashatra #Mumbai #News #Entertainment #Sports #Politics
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2020
संबंधित बातम्या:
स्थानिक पातळीवर काँग्रेस नाही, बिहारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जागांवर लढल्याने पराभव : पी चिदंबरम
भाजप इलेक्शन मोडवर,अमित शाहांचे मिशन बंगाल तर जे.पी.नड्डांची भारत प्रवास यात्रा
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये घमासान, अधीर रंजन चौधरींचं कपिल सिब्बल यांना जोरदार प्रत्युत्तर
(after bihar election all party ready to battle for Assembly elections in 5 states)