कुणी सलमान घ्या, कुणी शाहरुख घ्या, किंमत फक्त… यात्रेत विकायला आलेल्या गाढवांची चलती; फिल्मी नावांमुळे चर्चा तर होणारच
दीपावली निमित्ताने तब्बल 20 हजार भाविकांनी सोमवारी चित्रकूटमधील मंदाकिनी नदीत स्नान केलं. ही नदी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून वाहते.
लखनऊ: सिनेमा आणि भारतीयांचं अतूट नातं आहे. भारतीयांवर सिनेमाचा (cinema) प्रचंड प्रभाव आहे. तो इतका की लोक आपल्या मुलांचं नाव अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नावावर ठेवतात. एवढंच कशाला काही लोक तर आपल्या प्राण्यांच्या नावालाही कलाकारांची नावे देतात. उत्तर प्रदेशात तर काही लोकांनी गाढवांना बॉलिवूडच्या कलाकारांची नावे दिली आहेत. उत्तर प्रदेश (uttar pradesh) आणि मध्यप्रदेशाच्या (madhya pradesh) सीमेवर चित्रकूट म्हणून परिसर आहे. या ठिकाणी दरवर्षी पाच दिवसांसाटी यात्रा भरते. धनतेरसच्या दिवशी सुरू झालेला हा बाजार भाऊबीजपर्यंत सुरू असतो. यावेळी रविवारी हा बाजार भरला. या यात्रेतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो आणि त्याची खरेदी विक्री होते.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी चित्रकूट येथे गाढवांची जत्रा भरते. दरवर्षी मंदाकिनी नदीच्या किनारी गाढवांची जत्रा भरते. यावेळी तब्बल पाच हजार गाढवं विक्रीसाठी आणली जातात. विशेष म्हणजे त्यांची किंमत लाखोंच्या घरात असते. चित्रकूट हे मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर असल्याने दोन्ही राज्यातील व्यापारी, विक्रेते आणि खरीददार या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात, अशी माहिती यात्रेचे आयोजक मुन्नालाल त्रिपाठी यांनी सांगितलं.
या यात्रेत आणल्या जाणाऱ्या गाढवांना फिल्मी कलाकारांची नावे देण्यात आली आहेत. सलमान, शाहरुख, रणबीर, ऋतिक आणि राजकुमार अशी या गाढवांची नावे आहेत. या गाढवांची बोली लावून ते विकले जातात. जो जेवढी मोठी बोली लावेल, त्याचे सलमान आणि शाहरुख होतात. यंदा या बाजारात सलमानची किंमत सर्वाधिक आहे. त्याची किंमत 1 लाख ते दीड लाखापर्यंत असल्याचं एका व्यापाऱ्याने सांगितलं.
कुणाची किंमत किती?
सलमान- 1 लाख रुपये शाहरुख- 90 हजार से 1 लाख रुपये ऋतिक- 70 हजार रुपये रणबीर- 40 हजार रुपये राजकुमार- 30 हजार रुपये
दीपावली निमित्ताने तब्बल 20 हजार भाविकांनी सोमवारी चित्रकूटमधील मंदाकिनी नदीत स्नान केलं. ही नदी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून वाहते. पौराणिक कथेनुसार, श्रीरामाने आपल्या 14 वर्षाच्या वनवासापैकी अधिक काळ चित्रकूटमध्ये व्यतित केला होता.
14 वर्षाचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येला आले. त्यांच्या आगमना प्रित्यर्थ दिवाळीचा सण साजरा केला जातो. सध्या या भाविकांनी चित्रकूटमधील 10 किलोमीटरच्या परिसरात आपलं बस्तान बसवलं आहे.