महाराष्ट्राच्या सुपुत्राची ‘फनी’वर मात, तीन लाख लोकांचा जीव वाचवण्यात यश
भुबनेश्वर (ओडिशा) : ‘फनी’ या भीषण चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. या संकटाला तोंड देताना एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर यंत्रणांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या वादळाचा फटका ओडिशातील गंजाम जिल्ह्यालाही बसणार होता. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र आणि गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या नियोजनामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली […]
भुबनेश्वर (ओडिशा) : ‘फनी’ या भीषण चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. या संकटाला तोंड देताना एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर यंत्रणांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या वादळाचा फटका ओडिशातील गंजाम जिल्ह्यालाही बसणार होता. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र आणि गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या नियोजनामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे वादळादरम्यान स्वत:च्या जीवाची पर्वा न करता विजय यांनी इतरांचे जीव वाचवले. विजय यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ ताशी 200 किमी वेगाने शुक्रवारी (3 एप्रिल)ला ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं. सुपर सायक्लोन गटातील या वादळामुळे आतापर्यंत 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. या वादळाआधी ओडिशा सरकारतर्फे 26 लाख लोकांना मॅसेज पाठवण्यात आले होते. तसेच, 43 हजार स्वयंसेवक, एक हजार आपत्कालीन कर्मचारी, टीव्हीवर जाहिराती, समुद्र किनारी भागात अलार्म, ठिकठिकाणी बस सेवा, पोलीस अधिकारी आणि घोषणा या ताफ्यासह राज्य सरकारने या विध्वंसक वादळाला तोंड दिलं.
या वादळादरम्यान गंजाम जिल्ह्यातील पाच तालुक्यांना फनी वादळाचा फटका बसला होता. मात्र, गंजाम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी गुरुवारी (2 एप्रिल) तीन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले. त्यात प्रामुख्याने गरोदर स्त्रिया, अपंग आणि वयोवृद्ध यांचा समावेश होता. यात 541 गरोदर महिलांचा समावेश होता. विशेष म्हणजे फनी वादळ धडकलं त्या दिवशी तब्बल 153 महिलांनी बाळाला जन्म दिला. तसेच, स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना अन्न, शुद्ध पाणी, जनरेटर, तसेच वैद्यकीय सेवाही पुरवण्यात आल्या.
301460 people evacuated..541 pregnant women shifted to hospital safely..now wind and heavy rain at coastal area in ganjam @SRC_Odisha pic.twitter.com/y38BKR1guu
— Collector & District Magistrate, Ganjam (@Ganjam_Admin) May 3, 2019
इतकंच नव्हे तर, स्थलांतर झालेल्या अनेक व्यक्ती त्यांच्यासोबत जनावरे आणि पाळीव प्राणी घेऊन आले होते. त्यांचेही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. तसेच, प्रत्यक्ष वादळ ओडिशात दाखल झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन रस्त्या-रस्त्यांवर फिरुन करण्यात आलं. या आवाहनाला लोकांनीही प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे, प्रत्यक्ष वादळ आल्यानंतर जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी अनेक लोकांना बाहेर काढण्यासाठी स्वत: पँट गुडघ्यापर्यंत वर करत मदतकार्यात सहभाग घेतला. त्यांच्या निर्णयांमुळे जिल्ह्यात मोठी जीवितहानी टळली. तसेच, वादळ शमल्यानंतर अवघ्या दोन तासात जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे केवळ ऑफिसमध्ये बसून आदेश न देता, प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष काम करावे, असे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे.
ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये या नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यासाठी एनडीआरएफसह इतर यंत्रणांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे संयुक्त राष्ट्रानेही (यूएन) भारताच्या यशस्वी नियोजनाचे कौतुक केले आहे. तसेच, उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रीवादळांचा सामना कसा करायचा असतो, याचं उत्तम उदाहरण ओडिशामध्ये पाहायला मिळाल्याचेही संयुक्त राष्ट्राने म्हटलं. जगभरात शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या चक्रीवादळासारखंच हे वादळ होतं, पण यशस्वी नियोजनामुळे परिस्थिती हाताळता आली, असं यूएनने म्हटलंय.
संबंधित बातम्या :