किसान मोर्चा LIVE : शेतकऱ्यांचं वादळ संसदेवर
नवी दिल्ली: कर्जमाफी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत धडकले आहेत. दोनशेपेक्षा जास्त शेतकरी संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. काल दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलन केल्यानंतर आज किसान मुक्ती मोर्चा संसद भवनावर धडकणार आहे. LIVE UPDATE : नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किसान मुक्ती मोर्चात सहभागी होणार, […]
नवी दिल्ली: कर्जमाफी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत धडकले आहेत. दोनशेपेक्षा जास्त शेतकरी संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. काल दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलन केल्यानंतर आज किसान मुक्ती मोर्चा संसद भवनावर धडकणार आहे.
LIVE UPDATE :
- नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किसान मुक्ती मोर्चात सहभागी होणार, दुपारी तीन वाजता मोर्चात सहभागी होणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही मोर्चात सहभागी होणार
-
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल, शरद पवार, शरद यादव, जयप्रकाश नारायण यादव, के.सी. त्यागी, सीताराम येचुरी, डी राजा इत्यादी नेते संसद मार्गावर मोर्चाला भेट देण्यासाठी पोहोचणार
- नवी दिल्ली : स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या महिला संसद मार्गावर पोहोचल्या
- नवी दिल्ली : शेतकरी मोर्चा जाकीर गुरुनानक चौका पर्यंत पोहोचला
- नवी दिल्ली : रामलीला मैदानावर शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला, शेतकरी नेत्यांची पोलिसांसोबत चर्चा सुरु
कृषीक्षेत्रावर ओढवलेले आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीने केली आहे. या समितीच्या नेतृत्त्वात, महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. तब्बल 200 शेतकरी संघटना एकत्र येत, संपूर्ण देशातून पदयात्रा करुन, मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत आले आहेत. या दोन दिवसीय आंदोलनात देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी दिल्लीत आले आहेत.
‘किसान मुक्ती मोर्चा’ला गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. त्यामुळे आज सकाळी 10 वाजता हे शेतकरी रामलीला मैदान ते संसदेपर्यंत मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा रामलीला मैदानापासून सुरु होऊन गुरुनानक चौक, रणजीतहिंग उड्डाणपूल, केजी मार्ग, जंतर मंतर मार्गे संसद भवनावर धडकणार आहे.
माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी काल शेतकऱ्यांची भेट घेतली, तर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या मोर्चाला भेट देण्याची शक्यता आहे.
लष्कराच्या माजी सैनिकांच्या संघटनेनेही या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ किसान मुक्ती मोर्चात सहभाग घेतला आहे. या संघटनेचे प्रमुख मेजर जनरल सतबीर सिंह यांनी सांगितले की, माजी सैनिक दोन्ही दिवस या आंदोलनात सहभागी होणार आहेत. एखाद्या आंदोलनाच्या समर्थनात डॉक्टर, वकील, शिक्षक, रंगकर्मी, विद्यार्थी, माजी सैनिक यांसहित इतर समाजातील संघटनांनी सहभाग घेणे, हे पहिल्यांदाच घडत आहे.
संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, महाग शिक्षण आणि आरोग्यसेवांमुळे वाढलेला कर्जाचा बोजा, कर्जामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, पाण्याच्या खासगीकरणामुळे वाढते जलसंकट, महिला शेतकऱ्यांचे अधिकार, शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या भूमीहीन शेतमजुरांचे प्रश्न, शेतीचे भविष्य अशा सात विषयांवर संसदेत प्रत्येकी तीन दिवस चर्चा व्हावी, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात एका पत्राद्वारे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा मोर्चा द्ल्लीत धडकला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
• शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे
• स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या
• शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं
• शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा
• एफआरपी हा शेतकऱ्यांचा हक्क ठरवणारं खासगी विधेयक मंजूर करावं
• पेट्रोल, डिझेल आणि विजेचे दर कमी करावे
• नवे ट्रक, ट्रॅक्टर परवडत नसल्याने एनजीटीने घतलेली 10 वर्षांच्या वाहनांवरील बंदी हटवा
• ऊसाची थकलेली 10 हजार कोटींची बिले लवकरात लवकर द्यावी