सिद्धूंमुळे काँग्रेसला नुकसान, व्हिडीओ क्लिपसह राहुल गांधींकडे तक्रार
नवी दिल्ली : एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पण अमरिंदर सिंह आणि त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील अंतर वाढत चाललंय. सिद्धू आणि त्यांची पत्नी नवजोत कौर सिद्धू यांची तक्रार आता दिल्ली दरबारी करण्यात आली आहे. कथित व्हिडीओ क्लिपसह सिद्धूंचा रिपोर्ट काँग्रेस अध्यक्ष राहुल […]
नवी दिल्ली : एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पण अमरिंदर सिंह आणि त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील अंतर वाढत चाललंय. सिद्धू आणि त्यांची पत्नी नवजोत कौर सिद्धू यांची तक्रार आता दिल्ली दरबारी करण्यात आली आहे. कथित व्हिडीओ क्लिपसह सिद्धूंचा रिपोर्ट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धू आणि त्यांच्या पत्नी नवजोत कौर यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात दिलेल्या वक्तव्यांचे व्हिडीओ काँग्रेस हायकमांड आणि राहुल गांधींना पाठवण्यात आले आहेत. सिद्धू यांनी या प्रकारची वक्तव्ये जाहीर व्यासपीठांवरुन देऊन काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय, असं या तक्रारीमध्ये म्हटल्याचं बोललं जातंय.
नवजोत कौर यांची अमृतसरमधून निवडणूक लढण्याची इच्छा होती. पण त्यांना तिकीट मिळालं नाही. नवजोत यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि प्रभारी आशा सिंह यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. हे दोघे आपल्याला तिकीट देण्यास पात्र समजत नाहीत, असा आरोप नवजोत यांनी केला होता. दसऱ्याच्या वेळी जो अपघात झाला होता, त्याचा दाखला देत माझं तिकीट कापलं, असंही त्या म्हणाल्या होत्या.
अमरिंदर सिंह आमचे ज्युनियर कॅप्टन आहेत. राहुल गांधी हे सीनियर कॅप्टन आहेत. आमचे ज्युनियर कॅप्टन म्हणाले होते की मी स्वतःच्या बळावर पंजाबमधील 13 जागा जिंकू शकतो. जर त्यांना 13 जागा जिंकता आल्या नाही तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी नवजोत यांनी केली होती. विशेष म्हणजे या वक्तव्याचं समर्थन खुद्द मंत्री नवजोत सिंह सिद्धू यांनी केलं होतं.
अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्यातही जमत नसल्याचं चित्र आहे. सिद्धू यांना माझ्या पदाला आव्हान द्यायचं असेल तर त्यांनी हा मुद्दा पक्ष नेतृत्वासमोर लावून धरला पाहिजे, असं काही दिवसांपूर्वी अमरिंदर सिंह म्हणाले होते. सिद्धू हे महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यात काहीही गैर नाही. लोकांमध्ये महत्त्वाकांक्षा असतात. वैयक्तिक आमच्यात कोणताही मतभेद नाही. बहुमत मला हटवून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असावं. ती त्यांची अडचण आहे, असंही अमरिंदर सिंह म्हणाले होते.