वायूसेनेच्या हल्ल्यापूर्वी बालाकोटच्या कॅम्पवर 300 मोबाईल कार्यरत होते : NTRO
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ज्या तळावर हल्ला केला, तिथे हल्ला करण्यापूर्वी 300 मोबाईल कार्यरत होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्र संशोधन संस्था म्हणजेच एनटीआरओकडून देण्यात आली आहे. हल्ला करण्यापूर्वी एनटीआरओकडून याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतरच हल्ल्याला परवानगी देण्यात आली होती. 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायूसेनेच्या मिराज […]
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ज्या तळावर हल्ला केला, तिथे हल्ला करण्यापूर्वी 300 मोबाईल कार्यरत होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्र संशोधन संस्था म्हणजेच एनटीआरओकडून देण्यात आली आहे. हल्ला करण्यापूर्वी एनटीआरओकडून याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतरच हल्ल्याला परवानगी देण्यात आली होती.
26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील खैबर पंख्तुन्वा प्रांतात असलेल्या बालाकोटमध्ये घुसून एअर स्ट्राईक केली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची कंट्रोल रुम आणि प्रशिक्षण तळावर एक हजार किलो बॉम्ब टाकत वायूसेनेने जैशच्या इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या.
एअर स्ट्राईकमध्ये किती जण मारले गेले याचा कोणताही अधिकृत आकडा सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. पण आम्ही टार्गेट उद्ध्वस्त केलं, असं वायूसेनेकडून सांगण्यात आलं होतं. बालाकोटमध्ये बॉम्ब टाकण्यापूर्वी एनटीआरओकडून केलेल्या तपासणीत 300 कार्यरत मोबाईल आढळून आले होते. त्यामुळे 300 दहशतवादी मारल्याच्या दाव्याला बळ मिळालं आहे.
एअर स्ट्राईकवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भारताच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले याचे पुरावे सरकारने द्यावेत, अशी मागणी विरोधकांची आहे. त्या पार्श्वभूमीवर एनटीआरओचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. जैश ए मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.