200 किलो स्फोटकं घेऊन जाणाऱ्या गाडीचा सीआरपीएफ जवानांवर हल्ला
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात उरी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 20 जवान शहीद झाले आहेत आणि अनेक जवान जखमी आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता, की गाड्यांचे तुकडे-तुकडे झाले आहेत. ज्या गाडीचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला, त्या गाडीमध्ये 200 किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती. जम्मू काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांच्या 54 व्या […]
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात उरी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 20 जवान शहीद झाले आहेत आणि अनेक जवान जखमी आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता, की गाड्यांचे तुकडे-तुकडे झाले आहेत. ज्या गाडीचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला, त्या गाडीमध्ये 200 किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती.
जम्मू काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांच्या 54 व्या बटालियनवर गुरुवारी दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी हा हल्ला झाला. पुलवामा जवळील अवंतीपुरामध्ये ही घटना घडली. सीआरपीएफ जवानांचा ताफा पुलवामाहून श्रीनगरकडे जात होता. ताफ्यात जवळपास 78 गाड्या आणि 2547 जवान होते. ताफ्यामध्ये 54 वी, 179 वी आणि 34 बटालियन एकत्र जात होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटकं घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये हल्लेखोर बसलेला होता. ही गाडी त्याने बसवर नेऊन आदळली. या स्फोटानंतर दहशतवाद्यानंतर गोळीबारही केला. घटनेनंतर श्रीनगर-जम्मू हायवे बंद करण्यात आलाय. स्फोट एवढा भीषण होता, की स्फोटाचा आवाज पाच किमीपर्यंत ऐकायला गेला. दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्लाही केला.
हायवेवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरक्षा व्यवस्था तैनात असते. तरीही एवढा मोठा हल्ला होणं ही सुरक्षेमध्ये मोठी चूक असल्याचं मानलं जातंय. ताफा जेव्हा जातो तेव्हाही चार ते पाच गाड्या सुरक्षेसाठी बाजूने चालतात. याशिवाय काही जवान पायी चालतही सुरक्षेची काळजी घेत असतात, जेणेकरुन एखादा दहशतवादी ताफ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करु नये.
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या दहशतवाद्याचा फोटोही जारी करण्यात आलाय. आदिल अहमद दार असं या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्या फोटोवर जैश ए मोहम्मद असं लिहिलेलं आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याचा दावा जैश ए मोहम्मदने केलाय. 2004 नंतर जम्मू-काश्मीरमधला हा पहिलाच आत्मघातकी हल्ला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांची उद्याची बिहारमधील रॅली रद्द केली आहे. ते जम्मू काश्मीरला जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शिवाय राष्ट्राय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल स्वतः परिस्थितीचा आढावा घेत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.