नवी दिल्ली : एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत (Richest List) दुसऱ्या क्रमांकावर असलेले उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. हिंडनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाची जोरदार पडझड झाली. गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. एवढेच नाही तर एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाही जीव टांगणीला लागला आहे. कारण सर्वसामान्यांची मोठी रक्कम अदानी समूहात गुंतविण्यात आलेली आहे. आता विरोधकांनी ही याच मुद्यावरुन केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी तब्बल 50 मिनिटं सरकारवर जोरदार प्रहार केला. केंद्र सरकारच्या हेतूवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले. 2014 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी 609 क्रमांकावर होते. त्यानंतर त्यांनी रॉकेट भरारी घेत दुसरा क्रमांक कसा गाठला, असा सवाल करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला.