Road Accidents : दरवर्षी रस्ते अपघातात 1 लाखांहून अधिक लोक गमावतात जीव, 70% अपघातांचं कारण माहीत आहे? वाचा…
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यावेळी गाडीत मागच्या बाजूस बसलेल्या सायरस यांनी सीटबेल्ट लावला नव्हता.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रविवारी दुपारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यावेळी गाडीत मागच्या बाजूस बसलेल्या सायरस आणि त्यांचे मित्र जहांगीर यांनी सीटबेल्ट (Seatbelt) लावला नव्हता. त्या दोघांचा अपघातात मृत्यू झाला तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. कारचा अतिवेग हे या अपघातामागाचे कारण मानले जात आहे. दरम्यान सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर रस्ते अपघाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. भारतात दरवर्षी शेकडो अपघात (Accident) होतात आणि त्यामध्ये अनेक निरपराध व्यक्तींनी जीव गमवावा लागतो. देशात दरवर्षी किती अपघात होतात आणि त्यामागचे कारण काय असते? जाणून घेऊ या…
रस्ते अपघातात किती लोकांचा झाला मृत्यू?
लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार, 2020साली रस्ते अपघातात 1 लाख 31 हजार 714 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2019 साली हा आकडा 1 लाख 51 हजार 113 इतका तर 2018 साली 1 लाख 51 हजार 417 इतका होता. दरम्यान 2017 साली रस्ते अपघातात 1 लाख 47 हजार 913 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
दरवर्षी किती अपघात होतात?
देशात दरवर्षी किती अपघात होतात, याची माहितीही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. 2020साली 3 लाख 66 हजार 138 अपघात झाले होते, जे 2019पेक्षा कमी होते. 2019 या वर्षात 4 लाख 49 हजार 002 अपघात झाले. तर 2018साली हा आकडा सर्वाधिक 4 लाख 67 हजार 044 इतका होता. 2017मध्ये एकूण 4 लाख 64 हजार 910 अपघात झाल्याची नोंद आहे.
सर्वात जास्त अपघात कोणत्या राज्यात होतात?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्वात अधिक अपघात कोणत्या राज्यात होतात, याचीही माहिती दिली आहे.
राज्य – 2017 2018 2019 2020
- तामिळनाडू – 65562, 63920, 57228, 45484
- मध्य प्रदेश – 53399, 51397, 50669, 45266
- कर्नाटक – 45542, 41707, 40658, 34178
- उत्तर प्रदेश – 38783, 42568, 42572, 34243
- केरळ – 38470, 40181, 41111, 27877
उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात सर्वात जास्त मृत्यू –
अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे सर्वात जास्त प्रमाण उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो
राज्य 2017 2018 2019 2020
- उत्तर प्रदेश – 20124, 22256, 22655, 19149
- महाराष्ट्र – 12264, 13261, 12788, 11569
- तामिळनाडू – 16157, 12216, 10525, 8059
- मध्य प्रदेश – 10177, 10706, 11249, 11141
- कर्नाटक – 10609, 10990, 10958, 9760
70 % अपघात वेगामुळेच –
देशभरात होणाऱ्या अपघातांचे कारणही समोर आले आहे. 70 टक्के रस्ते अपघात होण्यामागचे कारण म्हणजे गाडीचा अती वेग होय. सरकारनेही हे मान्य केले आहे.
सीटबेल्ट न लावल्यास दंड आकारणार : नितीन गडकरी
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधननंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Seat Belt) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटबेल्ट न लावल्यास आरटीओकडून दंड आकारण्यास येईल. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सीट बेल्टबाबत ही घोषणा केली.