पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींचा कायमस्वरुपी तोडगा
जम्मू काश्मीरचा मोठा भाग अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला भारतात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळखलं जातं.
मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढून या राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलंय. पण जम्मू काश्मीरचा मोठा भाग अजूनही पाकिस्तानच्या (Pakistan Occupied Kashmir – PoK) ताब्यात आहे, ज्याला भारतात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) (Pakistan Occupied Kashmir – PoK) आणि पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळखलं जातं. हा तुकडा परत मिळवण्यासाठी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कायमस्वरुपी तोडगा सांगितलाय.
पीओके परत मिळवायचा असेल तर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1947 ला संयुक्त राष्ट्रात दाखल केलेली अवैध याचिका मागे घ्या. ही याचिका मागे घेतल्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच एलओसी अवैध होईल आणि भारतीय सैन्याला पीओकेमध्ये प्रवेश करता येईल. मुजफ्फराबाद परत मिळवणं सहज शक्य आहे, असं ट्वीट स्वामींनी केलंय.
जम्मू आणि काश्मीरमधील इंच-इंच आपली आहेच, पण पाकिस्तानने अवैध कब्जा केलेला पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनही भारताचाच भाग आहे, असं गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक सादर करताना म्हटलं होतं. भारतीय सैन्य जिंकत असताना नेहरुंनी युद्धविरामाचा एकतर्फी निर्णय घेतला आणि संयुक्त राष्ट्रात याचिका दाखल केली, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवरही शरसंधान साधलं होतं.
भारतीय सैन्य तेव्हाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी समर्थ होतं, युद्धविराम दिला नसता, तर पीओके आज भारताचाच एक भाग असता, असं अमित शाह म्हणाले होते.
राज्यसभेत अमित शाहांपासून ते सुब्रमण्यम स्वामी आणि शिवसेना खासदार यांनीही पीओकेसह बलुचिस्तानही परत मिळवण्याची मागणी केली होती.
संबंधित बातम्या :