सरकार वाचवण्यासाठी भाजपचे शर्तीचे प्रयत्न, भाजप नेत्यांसह अजित पवारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक
महाराष्ट्रात एका रात्रीत राजकीय उलथापालथ झाली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला (BJP leaders and Ajit Pawar meeting). मात्र, आता त्यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
मुंबई: महाराष्ट्रात एका रात्रीत राजकीय उलथापालथ झाली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला (BJP leaders and Ajit Pawar meeting). भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली (BJP leaders and Ajit Pawar meeting). मात्र, आता त्यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
विधीमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासारख्या केंद्रीय नेत्यांपासून पक्षाचे महासचिव भूपेंद्र यादव आणि खासदारांची टीम देखील महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. दुसरीकडे भाजप कायदेशीर डावपेचांवरही मंथन करत आहे. याचाच भाग म्हणून आज (26 नोव्हेंबर) मुंबईतील हॉटेल ट्रायडंटवर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (27 नोव्हेंबर) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भाजपने तात्काळ कोअर कमिटीची बैठक घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता दिसत आहे.
विशेष म्हणजे याच हॉटेल ट्रायडंटमध्ये सोमवारी (26 नोव्हेंबर) रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील भेट देऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांनी कुणाची भेट घेतली आणि कशासाठी हा याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडे शरद पवार महाविकासआघाडीकडे 162 आमदारांचं संख्याबळ असून आपणच सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे ते सातत्याने अजित पवार यांच्या माघारीसाठी देखील प्रयत्न करत आहेत. यामागे शरद पवार यांची काय राजकीय खेळी आहे याची सध्यातरी स्पष्ट कल्पना येत नसल्याने केवळ अंदाजच लावले जात आहेत.