रणशिंग फुंकलं! संभाजीराजे छत्रपती शिवरायांचरणी झुकले, म्हणाले, मला तुमच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचंय…
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, ते राजे आहेत, त्यांनी राजेंसारखं वागलं पाहिजे, ते कधी भाजपच्या बाजून बोलले, कधी अँटी भाजप.
शिवसेनेनं (Shiv Sena) पाठिंबा नाकारल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje Chatrapati) आता एक फोटो पोस्ट केला आहे. याच फोटोवरुन आता चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोत संभाजीराजे छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक झालेले दिसत आहेत. त्यांनी शिवरायांना नमस्कार केलेला दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत संभाजीराजेंनी नवं रणशिंग फुंकलं आहे. शिवसेना प्रवेशाची ऑफर नाकारल्यानंतर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा नाकारला. आणि कोल्हापुरातून थेट नवा उमेदवारच जाहिर केला. शिवसेनेचा मावळा म्हणत राजेंऐवजी संजय पवार यांना सेनेकडून संधी मिळालीय. संजय पवार (Sanjay Pawar) हे कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र यामुळे आता तिढा अजूनही वाढलेला दिसत आहे. आज केलेल्या पोस्टवरुन संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष निवडणूक लढतील असंच दिसतं आहे, त्यामुळे जर असं झालं तर 10 जूनला प्रत्यक्ष मतदान होईल.
भाजपही तिसरा उमेदवार देणार?
दरम्यान, भाजपनेही संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देणार की नाही हे स्पष्ट केलंलं नाही. त्यात महाराष्ट्र भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यासाठीही उत्सुक असल्याचा सुतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 10 मतं कमी पडताहेत, मात्र आमची मार्केटमध्ये इतकी पत आहे की, 10 मतं आम्हाला आपोआप मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती जर उभे राहात असतील तर त्यांना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडून लढत मिळण्याची शक्यता आहे.
वो तो राजा है..
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, ते राजे आहेत, त्यांनी राजेंसारखं वागलं पाहिजे, ते कधी भाजपच्या बाजून बोलले, कधी अँटी भाजप. त्यांना आम्ही कधीही स्टेजवर येण्याचा आग्रह केला नाही. जेव्हा त्यांना उमेदवारी द्यायची होती, तेव्हा मला मोदीजींचा फोन आला, पगले हो क्या, वो तो राजा है, कार्यालय मै बुला के उसे एबी फॉर्म दोगे क्या, मै उन्हे राष्ट्रपती कोटा से उमेदवारी देता हूं.
पाहा स्पेशल रिपोर्ट :
स्वराज्यतून दिल्लीत एन्ट्री की महाराष्ट्राच्या राजकारणात?
दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तोच विचार आजच्या त्यांच्या पोस्टखालच्या कॅप्शनमध्ये दिसतो आहे,
महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…
…असं म्हणत संभाजीराजेंनी राजकारणात येण्याचं रणशिंग फुंकलंय, संभाजीराजे दिल्लीत चांगलेच रमले आहेत, त्यामुळे ते दिल्लीच्या राजकारणात जास्त उत्सूक असल्याचं म्हटलं जातंय, पण गेल्या काही काळात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातही एन्ट्री घेतलीय. मराठा मोर्चा असो की राजगडाचं संवर्धन सगळ्याच पातळ्यांवर संभाजीराजे पुढे असलेले दिसतात. त्यामुळे छत्रपतींचं ‘स्वराज्य’लवकरच राजकारणात सत्तेसाठी लढा देणार हे निश्चित आहे.