अकोल्यातून फडणवीसांची मोठी घोषणा, महाविकास आघाडीने स्थगिती दिलेली ‘ही’ योजना पुन्हा सुरू करणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यातून मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना बारा तास वीज देणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज अकोल्यातून मोठी घोषणा केली आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपाचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार (Jalyukta Shiwar) नावाची योजना सुरू केली होती. ही फडणवीस यांची एक महत्त्वकांक्षी योजना होती. मात्र 2019 ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. सत्ता येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील सरकारने या योजनेला स्थगिती दिली होती. योजनेला स्थगिती देण्यात आल्याने त्यावेळी मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात शिंदे, फडणवीस सरकार येताच देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना 12 तास वीज
येत्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी त्यांना आदिपुरुष चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारण्यात आले, मात्र त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. याबाबत मला माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवाबद्दल टीपनी करणे योग्य नाही. शिंदे यांच्यावर त्यांची नाराजी असेल, निराशा असेल मात्र दीड वर्षाच्या मुलावर बोलने योग्य नाही. मी तर म्हणतो उद्धव ठाकरे यांनी आपले शद्ब मागे घ्यावेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.