Sanjay Raut | प्रेतांच्या मतावर तुम्ही निवडून आलात तर राजीनामा द्या, दीपक केसरकरांचं संजय राऊतांना आव्हान!
बंडखोरांना वाटलं तर मी शिवसेना प्रमुख पदही सोडायला तयार आहे, अशी तयारी उद्धव ठाकरेंनी दाखवली आहे. मात्र पक्ष प्रमुखाबाबत आम्हाला कोणतीही तक्रार नसल्याचं आज दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.
मुंबईः प्रेतांच्या जीवावर तुम्ही निवडून आला असाल तर आधी राजीनामा द्या. प्रेतांच्या मतदानावर राज्यसभेत (Rajyasabha) पाऊल ठेवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं खुलं आव्हान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepan Kesarkar) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी दगाबाजी केलेले सर्व आमदार जिवंत प्रेतं आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. गुवाहटीतून ही प्रेतं इथे महाराष्ट्रात येतील, असंही ते म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावर शिंदेगटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. आज दीपक केसरकर यांनी त्याच वक्तव्याचा धागा पकडत राऊतांवर सडेतोड टीका केली. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आम्हीच तुमच्यासाठी मतदान केलं आणि महिनाभरानंतरच तुम्ही आम्हाला प्रेतं कसं म्हणू शकता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
टीव्ही 9 शी बोलताना आज दीपक केसरकर यांनी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘ प्रेतांच्या मतदानावर राज्यसभेत पाऊल ठेवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अजून तुम्ही शपथ घेतलेली नाही, राजीनामा द्या. तुमच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागे राहिलेले काही शिवसैनिक आहेत. त्यांच्या मतावर निवडून या. नंतर आमच्यावर टीका करा. नैतिक अधिकार पाहिजे. काय बोलताय तुम्ही….
” एक महिना आधी मतदान केलं. मी माझ्या हाताने मतदान केलंय. त्यांच्या नावावर पहिल्या पसंतीचं मत दिलंय. मला अधिकार आहे बोलण्याचा. आमच्या मनात गद्दार हा शब्दाकधी येणार नाही. त्यांची स्टेटमेंट किती लोकांना आवडतात, त्यांच्या स्टेटमेंटमुळे शिवसेना आणि भाजप लांब गेलेत. त्याचा कधी तरी विचार करा. आणि मग असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये..
‘उद्धव ठाकरेंना विरोध नाही..’
बंडखोरांना वाटलं तर मी शिवसेना प्रमुख पदही सोडायला तयार आहे, अशी तयारी उद्धव ठाकरेंनी दाखवली आहे. मात्र पक्ष प्रमुखाबाबत आम्हाला कोणतीही तक्रार नसल्याचं आज दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख यांना बंडखोर आमदारांपैकी कुणाचाही विरोध नाही, किंवा त्यांच्याबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. मात्र महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे, हीच सर्वांची इच्छा आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी दर्शवली तरी आज सर्व बंडखोर आमदार हे परत येतील आणि त्यांच्या आशीर्वादाने सत्तेची समीकरणे बदलावीत, हीच सर्वांची इच्छा आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली असून हे शेवटचे आवाहन असल्याचे केसरकरांनी सांगितले.