दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव; नारायण राणेंनी दिला ‘त्या’ चर्चांचा हवाला
मराठी मराठी या भावनिक वाक्यावर लोकांची मते घेतली. हिंदुत्वाच्या नावावर मते घेतली. हिंदुत्वासाठी यांचा त्याग काय आहे. मराठी माणसासाठी काय केलं? पोटाचा प्रश्न सोडवला का?
मुंबई: दिशा सालियन हत्या प्रकरणात केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी पहिल्यांदाच मोठा दावा केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांचा हात असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांचा हात असल्यानेच या प्रकरणाची दाबादाबी केली. तशी लोकांची चर्चा आहे. सचिन वाझेंनीच हे संपूर्ण प्रकरण मॅनेज केलं, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला. तसेच आपल्याला मारण्यासाठी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शकील आणि छोटा राजनला सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप करून राणेंनी एकच खळबळ उडवून दिली.
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. दिशा सालियनचाही खून झाला. तुम्ही मुख्यमंत्री असताना झाला. सुशांतची हत्या झाली. दिशा सालियनवर अत्याचार करून खून केला. का नाही आरोपींना अटक झाली? त्यात कोण कोण होते? कोण मंत्री होते? का वाचवलं त्यांना? वाझेंना खात्यात आणून वाचवलं ना त्यांना? असे सवाल नारायण राणे यांनी केले.
लोकं चर्चा करतात आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहेत. त्या अत्याचारात आहेत. आतापर्यंत मी नाव घेत नव्हतो. पण चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहेत. म्हणून लपवालपवी सुरू केली. हे सर्व वाझेंनी मॅनेज केलं. अशी पापं करायला मुख्यमंत्री झाले होते का?
आता उत्तराखंडच्या केसबद्दल सांगता. चुकीचं झालं ते आम्ही लपवणार नाही. पण दिशा सालियन आणि सुशांत सिंगबाबत जे पाप केलं ते तुम्हाला विसरता येणार नाही. आता तुमचं सरकार नाही. त्यामुळे आरोपी पकडले जाणार. मस्ती उतरवणार, असा इशाराच राणे यांनी दिला.
उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत. ते फार खोटं बोलतात. मी त्यांना लबाड असं नाव ठेवलं आहे. मनोहर जोशींच्या घरावर सदा सरवणकरला हल्ला करायला सांगितला होता. याच उद्धव ठाकरेंनी. खोटारडा माणूस. लबाड आहे, अशी टीका त्यांनी केली.
मला बाळासाहेबांनी घडवलं. माझ्या रक्तात स्वाभिमान आहे. मला मारण्यासाठी शकीलला सुपारी दिली. छोटा राजनला सुपारी दिली. सुभाष सिंगला दिली. राणेंना मारा म्हणून सांगितलं. मारलं का कुणीय़ आहे का कोणी आता जिवंत. मी पुरुन उरलो सर्वांना. या सुपाऱ्याही काय काम करू शकत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मराठी मराठी या भावनिक वाक्यावर लोकांची मते घेतली. हिंदुत्वाच्या नावावर मते घेतली. हिंदुत्वासाठी यांचा त्याग काय आहे. मराठी माणसासाठी काय केलं? पोटाचा प्रश्न सोडवला का? फक्त लोकांना भावनिक केलं. निवडणूक आल्यावरच सर्व दिसतं. आता त्यांचे पाच आमदार येणार नाहीत. एकही खासदार येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.