Agneepath Scheme Protest : अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध, 20 जूनला राज्यव्यापी आंदोलनाची हाक
युवक राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा युवक राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
मुंबई : अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) विरोध करण्यासाठी देशभरातील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन सध्या आणखी धारदार होत आहे. अश्यातच आता राज्यातही याची धग जाणवू लागली आहे. युवक राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा युवक राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
“ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी यासाठी 20 जूनला राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे”, असं रविकांत वरपे म्हणाले.
“देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम या भाजपने केले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी. त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये. युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपला मागे घ्यावाच लागेल. कारण या देशातील सच्चा देशभक्त आता जागा झाला आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
अग्निवीरांना चार वर्षे सेवा करावी लागणार
अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना सशस्त्र दलात ‘अग्नवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे, या योजनेत युवकांना एकूण 4 वर्षे देशसेवेची संधी दिली जाईल, ज्यामध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असेल. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची अग्निवीर म्हणून भरती केले जातील. 10वी आणि 12वी उत्तीर्ण युवक यासाठी अर्ज करू शकतील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) द्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे अग्निवीरांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवणे सोपे होईल. अग्निवीर म्हणून निवड झालेल्या 10वी उत्तीर्ण तरुणांना 12वी करण्याची संधी दिली जाईल. जेणेकरून ते चार वर्षानंतर त्यांचा अभ्यास सुरू ठेवू शकतात किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करू शकतात.