मनसेही मनसैनिकांकडून शपथपत्रं घेणार, कारण काय?; आदेश काय?
ज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत. आपल्याही पक्षात फूट पडण्याची भीती या राजकीय पक्षांना वाटत आहे.
निलेश डाहट, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, चंद्रपूर: शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? याचा वाद निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला आहे. त्यामुळे शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवकांपासून पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटानेही (shinde camp) आपल्या समर्थकांकडून अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रं घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही गटाने आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करण्यासाठी निष्ठेचं प्रतिज्ञापत्रं घ्यायला सुरुवात केलेली असतानाच दुसरीकडे मनसेनेही आपल्या मनसैनिकांकडून (mns) निष्ठेचे प्रतिज्ञापत्रं लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिवसेने नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं शपथपत्र भरून देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. चंद्रपुरात मनसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून दिले आहे. अशा प्रकारचे शपथपत्र भरून देणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी ते वरोरा येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी शपथपत्रं भरून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाच राज यांनी चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं भरून देण्याचे आदेश दिले होते. राज यांच्या याच आदेशानुसार चंद्रपुरात आजपासून शपथपत्रं भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत. आपल्याही पक्षात फूट पडण्याची भीती या राजकीय पक्षांना वाटत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या पक्षात भाकरी फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेतही फूट पडू नये यासाठी राज ठाकरे यांनी कंबर कसल्याचं सांगितलं जात आहे.
मनसेची ही निष्ठेचे प्रतिज्ञापत्रं भरून घेण्याची मोहीम फक्त चंद्रपुरापुरतीच मर्यादित असेल की राज्याच्या इतर जिल्ह्यातही ही मोहीम राबवली जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.