MLC Election : आमशा पाडवी, सचिन अहिर विधानपरिषदेवर जाणार; सुभाष देसाईंचं मंत्रीपद धोक्यात?
शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी दोन नावं समोर आली आहे. त्यात सचिन अहिर आणि आयशा पाडवी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांचा पत्त कट झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेनं संजय पवार तर भाजपनं धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे निवडणुकीत अधिक रंगत निर्माण झालीय. या निवडणुकीसाठी 10 जूनला मतदान होत आहे तर 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी दोन नावं समोर आली आहे. त्यात सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आयशा पाडवी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांचा पत्त कट झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
शिवसेना नेतृत्वाकडून विधान परिषदेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार मुंबईतून सचिन अहिर आणि नंदूरबारचे आमशा पाडवी यांना विधान परिषदेत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर आमशा पाडवी यांनी काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांना जोरदार टक्कर दिली होती. त्या पार्श्वभूमीवर अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
देसाईंना डावलून अहिर यांना विधान परिषद?
असं असलं तरी सुभाष देसाई यांना पक्षाने उमेदवारी नाकारली तर त्यांचं मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई हे उद्योग खातं चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. तसंच त्यांचा अनुभव दांडगा आहे. शिवाय ते कोणत्याही वादात नाही. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेला हा बाळासाहेबांचा शिवसैनिक पक्षाला रसद पोहोचवण्याचंही काम करतो. त्याचबरोबर उद्योग खातं सांभाळू शकेल असा दुसरा चेहरा शिवसेनेत सध्या दिसून येत नाही. त्यामुळे सुभाष देसाईंना डावलून सचिन अहिर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.
शिवसेना वरळीतून 3 आमदार देणार?
दरम्यान, सचिन अहिर यांनी आज वर्षा निवासस्थानी दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे अहिर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, सचिन अहिर हे वरळीतून येतात. आदित्य ठाकरे याच मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीची जागा सोडली होती. त्यानंतर शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. आता अहिर यांनाही विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास वरळीतून शिवसेनेचे तीन आमदार होतील. त्यामुळे पक्षात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे अहिर यांना विधान परिषदेची संधी मिळण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.