Deepak Kesarkar : शिंदे गटाची शिवसेनेला डेडलाईन?, दीपक केसरकरांनी हातही जोडले? परिणाम साधणार?
शिवसेना पक्ष प्रमुख यांना बंडखोर आमदरांपैकी कुणाचाही विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, महाविकास आघाडीमधून शिवसेनेने बाहेर पडावे हीच सर्वांची इच्छा आहे. याकरिता उद्धव ठाकरे यांनी तयारी दर्शवली तरी आज सर्व बंडखोर आमदार हे परत येतील आणि त्यांच्या आशिर्वादाने सत्तेची समीकरणे बदलावीत हीच सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, आता निर्णय घेण्याची वेळ आली असून कदाचित हे शेवटचे आवाहन असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.
मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेदाचे अंतर वाढत जात असताना आ. दीपक केसरकर यांनी मात्र, बंडखोर आमदारांच्या वतीने मध्यस्तीची भूमिका घेतलेली आहे. बंडखोर आमदारांचा गट झाला असला तरी (CM Uddhav Thackarey) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आजही आदर कायम आहे. त्यामुळे (MVA) महाविकास आघाडीमधून बाहेर पडून भाजपाबरोबर युती करण्याची मागणी या सर्व आमदारांची आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाकडून या युतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा या 39 आमदारांची जी भूमिका राहणार तीच आपलीही असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय जनेच्या हीतासाठी आणि पक्षासाठी हा निर्णय घ्यावा म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पक्ष प्रमुखांच्या आशिर्वादानेच सर्वकाही व्हावे
शिवसेना पक्ष प्रमुख यांना बंडखोर आमदरांपैकी कुणाचाही विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, महाविकास आघाडीमधून शिवसेनेने बाहेर पडावे हीच सर्वांची इच्छा आहे. याकरिता उद्धव ठाकरे यांनी तयारी दर्शवली तरी आज सर्व बंडखोर आमदार हे परत येतील आणि त्यांच्या आशिर्वादाने सत्तेची समीकरणे बदलावीत हीच सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, आता निर्णय घेण्याची वेळ आली असून कदाचित हे शेवटचे आवाहन असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील अंतर वाढत असले तरी सर्वकाही बाजूला सारुन भाजपसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले जात आहे.
बंडखोर हे पक्षाशी गद्दार नाहीत
बंडखोर आमदार हे पक्षाशी गद्दार असल्याचे सांगून काही नेत्यांकडून मतभेद वाढवले जात असल्याचे म्हणत केसरकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे. शिवसैनिक हा कधीच गद्दार होणार नाही. उलट या सर्वांनी पक्षाच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी हा लढा उभा केला आहे. गद्दार म्हणून सर्वसामान्यांची माथी भडकावू नकात. या बंडखोर आमदारांचीच भूमिका कशी योग्य आहे हे काही दिवसांमध्येच लक्षात येईल असेही केसरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे वेळ निघून जाण्यापूर्वी निर्णय घेण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.
अन् केसरकरांनी हात जोडले
महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास आजही आम्ही यायला तयार आहोत असे म्हणत केसरकर यांनी थेट हात जोडून निर्णय घेण्यााबाबत उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. उद्या बहुमत सिध्द करण्याची वेळ आली तर ते करावेच लागेल. त्यामुळेच सर्वकाही वेळेत झाले तर महारष्ट्राच्या हिताचे होणार आहे. गेल्या अडीच वर्षापासून होत असलेली घूसमट बाजूला करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यासंबंधी हात जोडून विनंती केली आहे.