पांढऱ्या पावलाचं सरकार आलं अन् प्रकल्प गुजरातेत गेला, माफी मागा, शिवसेना नेत्या संतापल्या
वेदांता प्रकल्पावरून शिंदे सरकार आणि विरोधी पक्षांमधील आरोप प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीयेत. भाजप नेते आशिष शेलार यांच्या आरोपांना शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंनी सडेतोड उत्तर दिलंय.
मुंबईः पांढऱ्या पावलाचं सरकार आलं अन् प्रकल्प गुजरातेत गेला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प (Vedanta Project) महाराष्ट्राबाहेर गेल्याबद्दल माफी मागितली पाहिजे. उगाच खोटं सांगून जनतेची दिशाभूल करू नये, असं वक्तव्य शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केलंय. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने (MVA) काय केलं, याची चौकशी झाली पाहिजे, असा आग्रह भाजपतर्फे धरण्यात येतोय. यासाठी मविआ सरकारने भूखंड अधिग्रहणासाठी 10 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर मनिषा कायंदेंनी प्रत्युत्तर दिलंय.
आशिष शेलार काय म्हणाले?
वेदांता प्रकल्पावरून शिवसेनाला टार्गेट करत आशिष शेलार म्हणाले, ‘ गोलमाल, पाप, कमिशन कुणाचं याचा सुगावा लागलाय. फडणवीसांनी एमआयडीसीत भूखंड अधिग्रहण करतानाचा भ्रष्टाचार काल मांडला, कुठल्याही प्रकल्पाला द्याव्या लागणाऱ्या सवलती ठाकरे सरकारने बंद केल्या. त्या पुन्हा सुरु करण्यासाठी 10 टक्क्याची लाचखोरी केली. हा संशय मी मांडला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे’, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय.