ईडीच्या भीतीमुळे आमदार पळाले; शेवटचा आमदार गेला तरी मी शिवसेनेतच; वैभव नाईकांची प्रतिक्रिया
शेवटचा आमदार शिवसेना सोडून गेला तरी आपण मात्र शिवसेनेतच राहणार असल्याचे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अनेक जण ईडीच्या भीतीने पळाल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळणारा आमदारांचा पाठिंबा वाढतच आहे. शिवसेनेच्या (shiv sena) गोटातील आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. 40 पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. रविवारी उदय सामंत देखील शिंदे गटात सहभागी झाले. या सुरू असलेल्या सर्व प्रकारावर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेवटचा आमदार शिवसेना सोडून गेला तरी आपण मात्र शिवसेनेतच राहणार असल्याचे वक्तव्य आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केले आहे.व सावंतवाडी येथील शिवसेनेच्या रॅली नंतर ते ‘tv9’ शी बोलत होते. शिवसेनेतील अनेक आमदार हे केवळ ईडी आणि अन्य तपास यंत्रणेच्या चौकशीचा फेरा वाचावा म्हणून शिवसेनेतून फुटल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘आमदारांना चौकशीची भीती’
यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, शेवटचा आमदार शिवसेना सोडून गेला तरी मी शिवसेनेतच राहील. खुर्चीसाठी काहीजण पक्षाला सोडून जात आहेत. बंडखोर आमदारांच्या पाठीमागे भाजपा आहे. प्रताप सरनाईक, यामीनी जाधव यांच्यासारख्या आमदारांवर भाजपाने आरोप केले आहेत, त्यांच्या चौकशा लावल्या आहेत. त्यामुळे काही आमदार हे ईडीच्या भीतीने देखील फुटल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी दीपक केसरकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत हे केसरकर यांच्या मतामुळे खासदार झाले नाहीत. मात्र केसरकर यांना निवडून देणाऱ्या मतदारांना आज काय वाटत असेल असा टोला देखील आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी लगावला आहे.
राऊतांना ईडीची नोटीस
एकीकडे राज्याच्या राजकारणात हा सर्व गोंधळ सुरू असताना दुसरीकडे संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी जमीन घोटाळ्यात संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आली होती. आता त्यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर रहावे यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. राऊतांना ईडीने नोटीस बजावण्यानंतर आता तर्कवितर्कांना उधान आले आहे. तर या नोटीसीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘हिसाब तो देना पडेगा’ म्हणत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान माझं डोकं उडवलं तरी चालेल पण गुवाहटीचा मार्ग पकडणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ईडीच्या समन्सनंतर दिली आहे.