तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त, देवेंद्रजी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा, शिवसेनेची टीका
विरोधी बाकावरील 105 लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांच्या काय होईल? असा प्रश्न सामानाच्या अग्रलेखातून उपस्थितीत करण्यात आला (Saamana Editorial) आहे.
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना खोचक सल्ला देण्यात आला (Saamana Editorial) आहे. ‘देवेंद्रजी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा’ असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. “नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षात राहणार नाही. त्यांच्या मागची माजी ही बिरुदावली लवकरच जाईल,” असे विधान केले होते. या वक्तव्यावरही शिवसेनेने टीका केली.
“नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षात राहणार नाही. त्यांच्या मागची माजी ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुदल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकरे आम्ही सुचवू शकतो,” अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करुन विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्यामार्गाने महाविकासआघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील 105 लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांच्या काय होईल?” असा प्रश्न सामानाच्या अग्रलेखातून उपस्थितीत करण्यात आला (Saamana Editorial) आहे.
“तसेच मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आता राहिलेले नाही. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकून विधीमंडळ अधिवेशनातील त्यांच्या पक्षाची दिशा ठरवून टाकली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारेच पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. विरोधी पक्षाने चहापान कार्यक्रमात हजेरी लावून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता.”
“राज्याच्या हिताच्या काही सूचना करता आल्या असत्या. शेतकरी, कष्टकरी अशा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला काहीच हरकत नव्हती, पण विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा आडमुठे धोरण स्वीकारले. विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरील बहिष्काराचे समर्थन करताना जो युक्तीवाद केला तो बिनबुडाचा आहे,” असेही म्हटलं आहे.
“फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद दोनदा भूषवले आहे. एकदा 5 वर्षे आणि दुसऱ्यांदा 80 तास. त्या 80 तासांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो. कारण 80 तासांत राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय यांच्यामार्फत संवाद साधूनही महाविकासआघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे,” असा टोलाही सामनातून लगावण्यात आला (Saamana Editorial) आहे.