पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात वात पेटली, आता कोकणातले पोपट गप्प का, शिवसेनेची बोचरी टीका
आता भाजपचे सगळे पोपट गप्प का बसलेत? कोकणातले पोपट गप्प का, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. | Arvind Sawant West Bengal Election Results 2021
मुंबई: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपच्या दणदणीत पराभवाची चिन्हं दिसू लागल्यानंतर आता महाविकासआघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालचा (West Bengal Election 2021) निकाल समोर आल्यानंतर आता भाजपचे ‘कोकणातले पोपट’ गप्प का बसलेत, असा टोला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लगावला. त्यांच्या या टीकेचा रोख भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या मुलांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे. (Shivsena MP on West Bengal Election Results 2021)
अरविंद सावंत यांनी रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. या दोन नेत्यांच्या हट्टामुळे संपूर्ण देश सरणावर गेला. भाजपने बंगालमध्ये गर्दी जमवली. मग आता भाजपचे सगळे पोपट गप्प का बसलेत? कोकणातले पोपट गप्प का, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. काही पोपट नुसतेच बोलतात. त्यांना आता बोलणेही मुश्किल होईल. लोक त्यांना फिरु देणार नाहीत, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.
‘पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत ‘या’ कारणामुळे फटका बसला’
बेळगाव आणि पंढरपूर येथील पोटनिवडणुका वेगळ्या वातावरणात पार पडल्या. पंढरपुरात काहींना वाटतंय की देवळात जाऊ दिलं नाही. भाजपने याठिकाणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं. त्याचा हा परिणाम दिसत असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.
‘पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची भक्कम विजयाच्या दिशेने वाटचाल’
संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या आकेडवारीनुसार, तृणमूल काँग्रेस 204 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 86 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.
संबंधित बातम्या:
लाश वही है, बस कफन बदल गया है, बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटलांचं भाष्य
(Shivsena MP on West Bengal Election Results 2021)