कचरा डेपोपासून स्वातंत्र्य कधी? गुलाब देत स्वातंत्र्यदिनी फुरसुंगीच्या ग्रामस्थांची गांधीगिरी
कचरा डेपोबाहेर फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील नागरिकांनी आंदोलन सुरु केलं. सुरुवातीला गांधीगिरी आंदोलनाच्या माध्यमातून कचरा डेपोच्या वाहनचालकांना गुलाबपुष्प दिले जात आहे
पुणे : पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न ऐन पावसाळ्यात पुन्हा पेटला आहे. फुरसुंगीचा कचरा डेपो कायमस्वरुपी हटवण्यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. कचरा डेपो हटाव कृती समितीनं स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत आंदोलन हाती घेतलं आहे. (Pune Fursungi Villagers Protest to relocate Garbage Depot)
कचरा डेपोबाहेर फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील नागरिकांनी आंदोलन सुरु केलं. सुरुवातीला गांधीगिरी आंदोलनाच्या माध्यमातून कचरा डेपोच्या वाहनचालकांना गुलाबपुष्प दिले जात आहे. ऐन पावसात ग्रामस्थांनी कचरा डेपोच्या प्रवेशद्वारात निदर्शन केली आहेत. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार आहे.
ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुण्यात मात्र कचरा साठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. अशा परिस्थितीत शहरात कचरा साठल्यानंतर नागरिकांचं आरोग्य पुन्हा धोक्यात येण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात पुणेकरांना कोरोनाबरोबर कचऱ्याची समस्या भेडसावणार आहे.
गेल्या तीस वर्षापासून ग्रामस्थ कचरा डेपो हटवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र या संदर्भात महापालिका दखल घेत नसल्यानं गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पुणे शहराच्या चार ठिकाणी कचरा डेपो सुरु करावेत, अशी मागणी फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील नागरिकांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला कधी या कचरा डेपोपासून स्वातंत्र्य मिळणार? असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 15 August 2020 https://t.co/HpZ0IupAem
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2020
(Pune Fursungi Villagers Protest to relocate Garbage Depot)