116 बोटी, धरणं 70 टक्केपर्यंतच भरणार, महापूर टाळण्यासाठी सरकारचं नियोजन
आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पूर परिस्थिती टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची घोषणा केली (Vijay Wadettiwar comment on Flood management).
पुणे : आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पूर परिस्थिती टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची घोषणा केली (Vijay Wadettiwar comment on Flood management). यात सर्व धरण साठ्यातील पाण्याचं नियोजन केलं जाणार असून ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येक धरणातील पाणीसाठा हा 70 टक्क्यांपेक्षा अधिक होऊ दिला जाणार नाही. तसेच संकटाच्या काळात उपयोगासाठी 116 बचाव बोटी खरेदी करण्यात येणार आहेत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “गेल्यावर्षी महापुरांनं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात थैमान घातलं होतं. त्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व धरण साठ्यातील पाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येक धरणातील पाणीसाठा हा 70 टक्क्यांपेक्षा अधिक होऊ जाणार नाही. याबाबत पूर्ण दक्षता घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर 116 बचाव बोटी खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना नवीन निकषानुसार मदत केली जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी पुणे विभागाला 35 कोटी रुपये दिले आहेत. यानंतर मागणीनंतर पुन्हा निधी दिला जाणार आहे.”
विजय वडेट्टीवार यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीत चक्रीवादळ नुकसान आणि मान्सून पूर्वतयारीचाही आढावा घेतला. गेल्या वर्षी सातारा, सांगली आणि कोल्हापूरला पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यासंदर्भात काय तयारी झाली आणि सरकारकडून त्यांना काय अपेक्षा या संदर्भात देखील आढावा घेण्यात आला. सध्या धरणात 20 टक्क्यांच्या वर पाणी असेल तर धरणात किती पाणी शिल्लक ठेवलं पाहिजे हे निश्चित करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येक धरणातील पाणीसाठा हा 70 टक्क्यांच्या वर जाता कामा नये, असं नियोजन असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
चक्रीवादळाचे पंचनामे अजून बाकी आहेत. पुणे जिल्ह्यातील घरांचं नुकसान, जखमी, मृत आणि इतर नुकसानीसाठी तातडीने निधी देण्याचे काम केलं जात आहे. सर्व सर्वे अहवाल 2-3 दिवसात येतील. जुने निकष अपुरे असून सर्व निकष बदलण्याचा निर्णय करत असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा :
Home Isolation | सौम्य लक्षणे असलेल्या ‘कोरोना’ रुग्णांचे आता घरात विलगीकरण शक्य
हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन
राज्यात 60 कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय, आणखी 7 हजार कैद्यांना सोडणार : गृहमंत्री
Vijay Wadettiwar comment on Flood management