
आयपीएलच्या अठराव्या सिझनचं विजेतेपद ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ (RCB) टीमने पटकावलं. या जेतेपदाच्या जल्लोषावेळी खेळाडूंच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर 47 जण जखमी झाले होते. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली होती. तब्बल 18 वर्षांनंतर आरसीबीने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. या घटनेनंतर आता बीसीसीआयने याबाबत एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
भविष्यात सत्कार समारंभ सुरळीत पार पडावा आणि कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बीसीसीआयने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबतीत खूप गंभीर असून हा नियम आतापासून सर्व आयपीएल संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल.
आरसीबी संघ व्यवस्थापनाने खुल्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्याचं जाहीर केलं होतं. विधानसौध ते चिन्नास्वामी स्टेडियम हे एक किलोमीटरचं अंतर होतं. कार्यक्रमापूर्वी ऑनलाइन स्वरुपात मर्यादित प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र दुपारी 11 वाजून 56 मिनिटांनी वाहतूक पोलिसांनी विजयी मिरवणूक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास आरसीबीची टीम बंगळुरू विमानतळावर दाखल झाली. तिथून बसने ते हॉटेलमध्ये दाखल झाले होते. खेळाडू विधानसौधकडे जाण्यापूर्वीच हजारो चाहते तिथे जमा झाले होते. त्यात जमावातील काही जण झाडावर चढले, तर काही कर्नाटक उच्च न्यायालयाच्या इमारतीवर गेले. पोलिसांच्या अंदाजानुसार दुपारी तीन वाजता तिथल्या एक किमी परिसरात पन्नास हजार जण होते. नंतर ही संख्या वाढतच गेली.
प्रवेशिका मर्यादित होत्या, तसंच विजयी मिरवणूक रद्द झाल्याचं अनेकांना माहीत नव्हतं. खेळाडू बंद वाहनातून स्टेडियमकडे जात असताना दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्टेडियमचं क्रमांक तीनचं प्रवेशद्वार काही काळ उघडण्यात आलं. त्यावेळी प्रवेशिका असलेले तसंच इतर क्रिकेटप्रेमींनी आत जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती.