खान्देशात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तापी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाश बॅरिजेसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 10 तर प्रकाशा बॅरेजचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून, सारंगखेडा बॅरेजमधून 1 लाख 32 हजार क्युसेक तर प्रकाशा बॅरेजमधून 1 लाख 90 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.