युवा शेतकऱ्याची आयडियाची कल्पना, कीड व्यवस्थापनासाठी वापरले निळे प्रकाश सापळे

| Updated on: Nov 10, 2022 | 2:34 PM

सौरऊर्जेवर चालणारे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अल्प किमतीत मोठे वरदान ठरले आहे.

युवा शेतकऱ्याची आयडियाची कल्पना, कीड व्यवस्थापनासाठी वापरले निळे प्रकाश सापळे
कीड व्यवस्थापनासाठी वापरले निळे प्रकाश सापळे
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : जिल्ह्यासह विदर्भ व तेलंगणाच्या सीमावर्ती भागात मिरची पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. सध्या मिरची पिक फुलाच्या स्थितीत आहे. गेली काही वर्षे विविध प्रकारचे परदेशी वाण वापरल्याने मिरची रोपांच्या फुलावर किडीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या शत्रू किडीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सध्या कुठल्याही प्रकारचे रासायनिक व नैसर्गिक विरोधी अस्त्र उपलब्ध नाही. परिणामी मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात बाधित होते. याच भागातील सतीश गिरसावळे नामक युवा संशोधक शेतकऱ्याने या सर्व स्थितीचा अभ्यास करून एक अफलातून आयडिया शेतकऱ्यांच्या सुपूर्द केली आहे. शेताच्या मध्यभागी सोलर प्लेट लावून निळी प्रकाशयोजना केली जाते. याच निळ्या प्रकाशाकडे हे शत्रू कीटक आकर्षित होतात. याच ठिकाणी असलेल्या पाण्यात पतंग वा शत्रू किडी पडून त्यांचा मृत्यू होतो.

सौरऊर्जेवर चालणारे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अल्प किमतीत मोठे वरदान ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील व तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात सध्या मिरची पिकातील फुल किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ही आयडिया हिट ठरली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांचा वावर देखील आहे. अशा स्थितीत संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सौर ऊर्जेवर चालणारे हे साधे सोपे उपकरण शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहे. विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा युवा संशोधक शेतकरी व त्याची टीम याचे प्रात्यक्षिक देत शेतकऱ्यांना याबाबत जागृत करत आहे. अशी माहिती संशोधक शेतकरी सतीश गिरसावळे यांनी दिली.

रब्बी पिक शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामात बोनस रक्कम देऊन जाते. मात्र यातील किडीचा प्रादुर्भाव उत्पादन कमी करत असल्याने याचा बंदोबस्त कसा करावा याबाबत शेतकरी चिंताग्रस्त असतो. अमोल भोंगळे यांनी तयार केलेल्या ब्ल्यू लाईट ट्रॅपमुळे शेतकऱ्यांची ही चिंता मिटली आहे. शिवाय या उपकरणात वीज भारनियमन देखील संकट नसल्याने हा उपाय अनोखा ठरलाय.

संशोधक वृत्तीने व शेतकऱ्यांना सहकार्य करत अमोल भोंगळे व त्यांच्या टीमने तयार केलेली हे यंत्र वापरून मिरची किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली जात आहे. या कल्पनेवर शेतकरी देखील बेहद्द खूष आहेत. असं पंचाळा येथील शेतकरी भास्कर वडस्कर व चनाखा येथील शेतकरी प्रमोद यांनी सांगितलं.