ढगाळ वातावरणाचा ‘या’ तीन मुख्य पिकांना धोका, काय आहे उपाययोजना ?

| Updated on: Nov 12, 2021 | 1:20 PM

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसांपासून केवळ ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या तर सुकु आहेत पण खरिपातील तूर, कापूस आणि नव्याने लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे.

ढगाळ वातावरणाचा या तीन मुख्य पिकांना धोका, काय आहे उपाययोजना ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा पिकांवर होत असतो. यंदा तर 15 दिवसांतून वातावरणात बदल होत आहे. शिवाय अशीच स्थिती ही कायम राहण्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. (Marathwada) मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसांपासून केवळ ढगाळ वातावरण आहे. ( Cloudy weather) त्यामुळे रब्बीच्या पेरण्या तर सुकु आहेत पण खरिपातील तूर, कापूस आणि नव्याने लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे.

फुलोऱ्यात असलेल्या तूरीला मारुका तर कापसाला बोंडअळीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन काढणीत असलेल्या या पिकांचा किडीपासून बचाव केला तरच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. ढगाळ वातावरण आणि हवेतील गारवा यामुळे धुई पडत आहे. तर कांद्याची वाढीवरही बदललेल्या वातावरणाचा परिणाम झाला आहे. तूरीवर मरुका अळी, कापसाला बोंडअळीचा तर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही तीन्हीही पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.

कांद्यावर फवारणी गरजेची

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. पावसाळी कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

असे करा तूरीवरील मारुकाचे व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट

मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रति मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. शिवाय बुरशीचाही धोका वाढत आहे.
फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.

कापसाला गुलाबी बोंडअळीचा धोका

खरिपातील कापसाला यंदा विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे झालेले नुकसान या पिकातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे अंतिम टप्प्यात गुलाबी बोंडअळीचा धोका वाढला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यानही या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला होता. तर आता कापूस वेचणी सुरु असताना निर्माण झालेले चित्र शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनासाठी वेचणी न डावलता वेळेत वेचणीचे काम केले तरच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. अन्यथा सोयाबीनप्रमाणेच कापसाचेही नुकसान होणार आहे. शिवाय ‘बीटी’ची फवारणी करुन पिकाचे या वातावरणापासून संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.

संबंधित बातम्या :

ऊस गाळपासाठी ऑनलाईन अर्ज, मात्र, एफआरपी थकबाकीदारांच्या वाटेला कारवाईचा बडगा

कांदा आणखी रडवणार? आवक घटल्यानं कांद्याचे भाव वधारले 

शेतजमीन विकत घेत आहात का? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी…!