आंबा प्रक्रिया उद्योगाला मिळणार उभारी, 141 उद्योजकांना मिळणार संधी

| Updated on: Oct 06, 2021 | 1:40 PM

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 141 प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे.

आंबा प्रक्रिया उद्योगाला मिळणार उभारी, 141 उद्योजकांना मिळणार संधी
आंबा
Follow us on

रत्नागिरी : कोकणाबरोबर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये केशरसह अन्य जातींची लागवड वाढत आहे. आंबा फळे व त्यापासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थाना वर्षभर देशपरदेशात भरपूर मागणी आहे. महाराष्ट्रातील कोंकण विभागात हापूस आंबा हे पारंपरिक फळपीक आहे. मात्र, तोडणी, वाहतूक आणि साठवणूक करताना आंब्याचे नुकसान होते. हेच नुकसान टाळण्यासाठी आता रत्नागिरी येथेच आंबा प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाणार आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 141 प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे.

असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक बळ देऊन रोजगारनिर्मिती हा सरकारचा उद्देश आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना केंद्र सरकारने राबविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामधूनच रत्नागिरी जिल्ह्यातील 141 उद्योजकांना आंबा प्रक्रिया उद्योग उभारणीला बळकटी देण्याचा सरकारचा मानस आहे. 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालवधीत ही योचना राबवायची असून प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या उत्पादनावर येथे प्रक्रिया केली जाणार आहे. लाभार्थ्यास एकूण प्रकल्पाच्या 35 टक्के रक्कम तर जास्तीत जास्त 10 लाख रुपये हे अनुदान दिले जाणार आहे.

उद्योग प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्र

आंबा तोडणी किंवा साठवणीनंतर प्रक्रिया करण्यापूर्वी फळे स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. या यंत्रांमध्ये आंबे टाकून आंब्यावरून नोझलच्या साह्याने पाण्याची फवारणी केली जाते. त्यामुळे फळावरील धूळ, डाग, रासायनिक अवशेष इ. स्वच्छ केले जातात. हे यंत्र संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलचे असून, यंत्राची क्षमता ही 100 किलो प्रति तास इतकी आहे. या यंत्राला 240 व्होल्ट विजेची आवश्यकता असून, त्याला 1 एचपी विद्यूत मोटार जोडलेली असते. यंत्राचा आकार हा 5 फूट बाय 2 फूट एवढा असतो. यंत्राचे वजन हे 90-110 किलो असून यंत्रांमध्ये 300 लीटर पाणी साठवता येते. या यंत्रांची किंमत 90 हजारापासून सुरु होतात.

कटिंग टेबल

या टेबलवर मजुराच्या साह्याने चाकूने आंबा कापला जातो. साल व कोय वेगळी करून तुकडे केले जातात. स्टेनलेस स्टिलपासून बनवलेल्या टेबलची लांबी 5 फूट व उंची 3 ते 4 फूट असते. तसेच वरील बाजूला फूड ग्रेड स्टीलचे कोटींग असते. या टेबलवर एका वेळेला 4 कामगार काम करू शकतात. या टेबलची किंमत 25 हजार रूपये आहे.

जिल्हा कृषी कार्यालयात करता येणार अर्ज

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 2020 – 21 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 141 प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी नवीन उद्योग उभारू इच्छिणाऱ्या किंवा सध्या असलेल्या उद्योगाचं विस्तारीकरण वा आधुनिकीकरण करू इच्छिणाऱ्यांना जिल्हा कृषी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. (Mango processing industry to get opportunities for 141 entrepreneurs)

संबंधित बातम्या :

पुर्वहंगामी द्राक्ष बाजारात, सोयाबीनप्रमाणेच मिळतोय मुहुर्ताचा दर

हिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी

साखर आयुक्तालयांच्या नियमांचे पालन करा, अन्यथा कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल