विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : शेतकऱ्यांनी एकरी 100 टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन केला, तर त्या शेतकऱ्याला मोफत विमान प्रवास करता येणार आहे. तसेच, ट्रॅक्टर, बुलेटचं बक्षीस देखील मिळणार आहे. कोल्हापुरात ऊस शेतकऱ्यांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
सध्याचा जमाना ‘बाय वन गेट वन फ्री’चा आहे. पण यात शेतकरीही मागे नाहीत. एरव्ही खेळांमध्ये किंवा लॉटरीत दिली जाणारी बक्षीस योजना आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे. कारण करवीर तालुक्यातील सावरडे दुमाला इथल्या कृषी विज्ञान मंडळानं ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा चालू आडसाली, हंगामी आणि चालू सुरु खोडा या तीन प्रकारात होणार आहे.
जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, बुलेट, रोटारेटर, मोटारसायकलसह 502 बक्षिसं दिली जाणार आहेत. इतकेच नाही तर ऊसाचे एकरी 100 टनापेक्षा जास्त ऊत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट विमान प्रवासाची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी कृषी विज्ञान मंडळ सावर्डे दुमाला इथे अर्ज भरावा लागेल. त्यानंतर मंडळाच्या माध्यमातून नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. माती परीक्षण आणि ऊस पिकांसाठी आवश्यक घटकांबाबत मार्गदर्शन केलं जाईल आणि गळीत हंगामापूर्वी निकाल जाहीर होईल. त्यामुळे ही स्पर्धा बळीराजाचा उत्साह वाढवणारी म्हणावी लागेल.