युवा शेतकऱ्याची कमाल, जिरे शेतीची 50 कोटींची उलाढाल

| Updated on: Jan 10, 2021 | 3:35 PM

राजस्थानातील शेतकरी योगेश जोशी यांच्या जिरे शेती व्यवसायाची उलाढाल 50 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. ( Yogesh Joshi Cumin Farming )

युवा शेतकऱ्याची कमाल, जिरे शेतीची 50 कोटींची उलाढाल
राजस्थानातील शेतकऱ्यांसह योगेश जोशी
Follow us on

जयपूर: राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील योगेश जोशी या युवा शेतकऱ्यानं जिरे शेतीतून (Cumin) प्रगती साधलीय. योगेश जोशी यांना जिरे शेतीला व्यावसायिक स्वरुप दिलं आहे. आता योगेश जोशींसोबत 3 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. तर, योगेश जोशींच्या जिरे शेती व्यवसायाची उलाढाल 50 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. शेतीमध्ये सुरुवातीच्या काळात अपयश आल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊन योगेश जोशींनी या क्षेत्रात घेतलेली भरारी प्रेरणादायी आहे. ( Yogesh Joshi from Rajasthan successful in cumin farming and business with fifty crore turnover)

सरकारी नोकरी ते जैविक शेतीचा प्रवास

शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करणं अशीच इच्छा योगेश जोशी याची देखील होती. कृषी विषयातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीसाठी प्रयत्नही केले. मात्र, सरकारी नोकरी मिळाली नाहीतर पर्याय असावा म्हणून योगेशने जैविक शेतीमधील डिप्लोमा पूर्ण केला. 2009 मध्ये शेती करण्यासा सुरुवात केली. सुरुवातीला शेतात कोणतं पीक घ्यावं याबाबत योगेश जोशींना प्रश्न पडला होता. त्यानंतर त्यांनी जिरे शेती करण्याचा निर्णय घेतला.

कृषी विज्ञान केंद्राकडून प्रशिक्षण

योगेश जोशींनी पहिल्यांदा एक एकरात जिरे शेती करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी त्यांना तोटा स्वीकारावा लागला. यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील संशोधकांची मदत घतेली. कृषी विज्ञान केंद्रात इतर शेतकऱ्यांसह प्रशिक्षण घेऊन योगेश जोशींनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली.

परदेशी कंपन्यांसोबत करार

योगेश जोशींनी जिरे शेती केल्यानंतर मार्केटिंग करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. सध्या ते भारतीय आणि परदेशी कंपन्यांसोबत काम करत आहेत. अमेरिका आणि जपानमधील कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे. जैविक शेतीला व्यावसायिक रुप देण्यासाठी रॅपिड ऑरगॅनिक कंपनीची स्थापना केली. याद्वारे सध्या त्यांच्या कंपनीसोबत 3 हजार शेतकरी जोडले आहेत. गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये 1 हजार शेतकरी जैविक शेतीकडे वळले आहेत.

जैविक शेतीला करिअरचा उत्तम पर्याय

जैविक शेती हा चांगला पर्याय आहे, असं योगेश जोशींनी सांगितले. जैविक शेतीमध्ये यशस्वी वाटचाल करायची असल्यास दोन ते तीन वर्षांचा वेळ द्यावा लागेल, असंही जोशी म्हणाले. योगेश जोशींना केंद्र आणि राज्य सरकारचे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीने मारलं, तरीही संकटाला गाढलं, इंदापूरच्या शेतकऱ्याने टोमॅटो शेतीतून 6 लाख कमावले

डोकं लावून शेती केली, 500 एकरवर कोथिंबीर पिकवली, 90 दिवसात लाखो कमावले!

( Yogesh Joshi from Rajasthan successful in cumin farming and business with fifty crore turnover)