नवी दिल्ली : अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेल्या मुलाची वडिलांनीच बेदम मारहाण करुन हत्या केली. राजधानी दिल्लीतील भारत नगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भारत नगर पोलीस ठाण्यातील दीप चंद बंधू रुग्णालयात परमजीत नावाच्या तरुणाला बेशुद्धावस्थेत दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर समजले की, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी परमजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीजेआरएम रुग्णालयात पाठवला.
परमजीतच्या बहिणीने सांगितले की, सकाळी ती घरी आली तेव्हा तिचा भाऊ परमजीत जखमी अवस्थेत बेडवर पडला होता. रात्री उशिरा त्याचे वडील दारुच्या नशेत घरी आले. त्यांनी आपल्या भावाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे तिने सांगितले.
परमजीतच्या बहिणीने सांगितले की, तिच्या भावाला गेल्या 14 वर्षांपासून अर्धांगवायू (पॅरालिसिस) झाला होता आणि तो बेडवर पडून होता. अशा परिस्थितीत वडिलांनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
परमजीतच्या बहिणीच्या जबाबाच्या आधारे दिल्लीतील भारत नगर पोलिस ठाण्यात आरोपी वडिलांविरुद्ध आयपीसी कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पित्याला अटक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त, पुण्यातील जीवरक्षक तरुणाने आयुष्य संपवलं
‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!