दहावी निकालानंतरच्या पुढील वाटा : कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम नेमका काय?

| Updated on: Jul 19, 2021 | 1:56 PM

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शेतीचं शिक्षण मिळावं म्हणून हा पदविका अभ्यास्क्रम सुरु करण्यात आला आहे.

दहावी निकालानंतरच्या पुढील वाटा : कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम नेमका काय?
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

मुंबई: दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीनंतर अनेक विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. यंदा अकरावी प्रवेशाच्या जागांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शेती हा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरु शकतो.

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम नेमका काय?

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यातर्फे कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शेतीचं शिक्षण मिळावं म्हणून हा पदविका अभ्यास्क्रम सुरु करण्यात आला आहे. तर, ग्रामीण भागात स्वयंरोजगाराबाबत जागरुकता आणि राज्य सरकारांना प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा म्हणून अभ्यासक्रम चालवला जातो. विद्यापीठाची एकूण 9 केंद्र आणि 76 कृषी प्रशिक्षण शाळा यांच्या मार्फत हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चालवला जातो. प्रत्येक केंद्राची प्रवेशक्षमता 60 इतकी असते. जिल्हानिहाय गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश दिले जातात. दरवर्षी एकूण 5 हजार पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतात.

विद्यापीठाचं कार्यक्षेत्र

महात्मा फुले कृषी विद्यापीट राहुरीचं कार्यक्षेत्र हे अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, पुणे , सोलापूर, सातारा , सांगली आणि कोल्हापूर आहे.

कृषी पदविका अभ्यासक्रम

कृषी पदविका अभ्यासक्रम हा दोन वर्ष कालावधीचा असतो. पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात कृषी मुलतत्वे, प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी औजारे, यंत्रेव आधुनिक सिंचन पद्धती, पीक संरक्षण, ग्रामीण समाजशास्त्र, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान असा एकूण 1100 गुणांचा अभ्यासक्रम असतो. यामध्ये 550 गुण लेखी परीक्षा आणि 550 गुण प्रात्यक्षिकाला असतात.

दुसऱ्या वर्षी सहकार पतपुरवठा व पणन, बिजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटीका व्यवस्थापन, फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया, सेंद्रीय शेती कृषी आधारीत उद्योग यामध्ये प्रात्याक्षिक आणि लेखी असे एकूण 1200 गुण असतात. दुसऱ्या वर्षी प्रात्याक्षिक 850 तर लेखी गुण 350 निश्चित असतात.

प्रवेश प्रक्रिया

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जुलै ते सप्टेंबर दरम्यान राबवली जाते. दहावी उत्तीर्ण असणं ही यासाठी प्रमुख पात्रता आहे. तर, शासकीय संस्थेत प्रवेश घेतल्यास दोन्ही वर्षांची फी साधारणपणे 40 हजारांच्या जवळपास असेल. तर खासगी संस्थेची फी 60 हजार असू शकते.

इतर बातम्या:

यूजीसीचा मोठा निर्णय, केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेश परीक्षा रद्द, नेमकं कारण काय?

दहावी निकालानंतरच्या पुढील वाटा: ITI चे 91 अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करतील आत्मनिर्भर