परदेशात शिक्षणासाठी निवास आणि भोजनाच्या खर्चासह शिष्यवृत्ती; 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

| Updated on: Aug 04, 2021 | 11:36 AM

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते.

परदेशात शिक्षणासाठी निवास आणि भोजनाच्या खर्चासह शिष्यवृत्ती; 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना
Follow us on

नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता आदिवासी विकास विभागाकडून ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 6 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली.

परदेशातील विविध विद्यापीठात अनेक नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याच हेतूने,आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशा 10 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आदिवासी विकास विभाग त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. तथापि, ज्या परदेशी विद्यापीठांचे जागतिक रँकिंग 300 पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देय असणार आहे.

“ट्युशन फी, परीक्षा शुल्कासह भोजन खर्च आणि निवास खर्चही देणार”

या शिष्यवृत्तीमध्ये आदिवासी विकास विभाग परदेशातील ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यापीठास ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या खात्यावर ट्युशन फी आणि परीक्षा फी जमा करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. निर्वाह भत्त्यामध्ये निवास आणि भोजन खर्च याचा समावेश असेल. याव्यतिरिक्त विमानप्रवास खर्च, व्हिजा फी, स्थानिक प्रवास भत्ता, विमा आणि संगणक अथवा लॅपटॉप यांचा खर्च विद्यार्थ्याने स्वत: करावयाचा आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याच्या पात्रतेचे निकष काय?

  • विद्यार्थ्याचे वय जास्तीत जास्त 35 असावे.
  • नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा 40 असेल.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख इतके असेल.
  • परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किंवा IELTS या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष विचार केला जाईल.
  • भूमिहीन आदिवासी कुटुंबातील , दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यास प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य असणार आहे.

अर्ज कसा करणार?

सर्व अपर आयुक्त कार्यालये आणि सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये तसेच https://tribal.maharashtra.gov.in येथून अर्जाचा नमुना उपलब्ध करून घ्यावा.

यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये येथे दिलेल्या मुदतीच्या आत जमा करावीत.

निवड प्रक्रिया कशी असणार?

  • संबंधित विद्यार्थ्याने विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या कालावधीत संबंधित प्रकल्प अधिकारी यांचेकडे सादर करावी.
  • प्रकल्प स्तरावर अर्जाची योग्य छाननी होऊन सदर अर्ज अपर आयुक्त यांच्यामार्फत आदिवासी विकास आयुक्तालयास सादर होईल.
  • यानंतर आयुक्तालय स्तरावर गठीत केलेल्या निवड समितीद्वारे विद्यार्थी निवड होईल.
  • सर्व आवश्यक शैक्षणिक प्रक्रिया, व्हिसा या पूर्ण होतील.

आयुक्त हिरालाल सोनावणे म्हणाले, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विभाग सतत प्रयत्नशील आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील ज्ञानाची कवाडे खुली होतील. याचसोबत उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करावे, असं आवाहन करतो.”

हेही वाचा :

दहावीची परीक्षा रद्द मात्र पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार? MSEC चा नेमका निर्णय काय?

मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, तारीखही ठरली

Student Welfare Scheme : परीक्षेत 60% गुण मिळवा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घ्या, लखनऊ विद्यापीठाची स्टुडंट वेलफेअर फंड योजना

व्हिडीओ पाहा :

Tribal Development department announce scholarship for education in foreign