REVIEW : अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : पडद्यामागील घटनांचा खुलासा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांचं नातं उत्तम पद्धतीने दाखवण्यात आलंय. हा चित्रपट बघितल्यावर डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दलचा आदर वाढेल असं वक्तव्य प्रोमोशनदरम्यान अनुपम खेर यांनी केलं होतं. चित्रपट बघितल्यानंतर अनुपम खेर यांनी केलेलं वक्तव्य तंतोतंत खरं ठरतं. कारण डॉ. मनमोहन […]

REVIEW : अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : पडद्यामागील घटनांचा खुलासा
Follow us on

संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांचं नातं उत्तम पद्धतीने दाखवण्यात आलंय. हा चित्रपट बघितल्यावर डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दलचा आदर वाढेल असं वक्तव्य प्रोमोशनदरम्यान अनुपम खेर यांनी केलं होतं. चित्रपट बघितल्यानंतर अनुपम खेर यांनी केलेलं वक्तव्य तंतोतंत खरं ठरतं. कारण डॉ. मनमोहन सिंह यांच्या आयुष्यातील अनेक रंजक प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

चित्रपटाची सुरुवात 2004 मध्ये लोकसभा जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करतानाच्या यूपीएच्या दृश्याने होते. सोनिया गांधी पंतप्रधानपदाचा त्याग करुन डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून वर्णी लागल्यानंतर खरा चित्रपट सुरु होतो. पत्रकार संजय बारु मनमोहन सिंह यांचे चाहते असल्यामुळे ते त्यांचे मीडिया सल्लागार बनतात आणि इथूनच पडद्यामागील राजकीय डावपेचांना सुरुवात होते. 2014 मध्ये द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याचा फटका युपीए सरकारला बसला होता. आता 2019च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याचा यूपीएला पुन्हा फटका बसणार का? हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

मनमोहन सिंह यांच्या भूमिकेत अनुपम खेर आणि संजय बारुंच्या भूमिकेत अक्षय खन्ना दोघांनीही अफलातून काम केलीयेत. विशेषत: अनुपम खेर यांनी मनमोहन सिंह यांचं बेअरिंग उत्तम पकडलंय. त्यांची चालण्याची स्टाईल, बोलणं सगळंच लाजवाब. तर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत अक्षयने चित्रपट रटाळ नाही होऊ दिलाय. चित्रपटावरुन अनेक वाद उद्भवले, पण चित्रपटात वाद होण्यासारखं खरंच काही जाणवलं नाही. वाद टाळण्यासाठी चित्रपटातील अनेक संवाद म्यूट करण्यात आलेत.

संजय बारू मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार असताना त्यांनी त्यांच्याबाबतीत केलेल्या निरीक्षणांचा उल्लेख या चित्रपटात दाखवलाय. चित्रपटात यूपीए सरकारच्या काळातील न्युक्लियर डील आणि मनरेगा यांसारखे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. तसेच आपल्या कार्यकाळात मनमोहन सिंह काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात, पण सोनिया गांधी त्यांची कशी अडवणूक करतात; आपल्याच पार्टीशी मनमोहन सिंग यांना कसं झगडावं लागलं हेही चित्रपटात दाखवण्यात आलंय. चित्रपटात अनेक ट्वीस्ट आहेत. याचं श्रेय दिग्दर्शक विजय गुट्टे यांना जातं. चित्रपट कुठेही डल पडणार नाही याची पूर्ण काळजी त्यांनी घेतलीय. त्यामुळेच प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडतोय.

कलाकारांचा अभिनय आणि लूक या चित्रपटाच्या जमेची बाजू आहेत. दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे याने पहिल्याच चित्रपटात चांगला प्रयत्न केलाय. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या पात्रांची खरी नावं चित्रपटात वापरण्यात आली आहेत. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक पॉलिटिकल ड्रामा चित्रपट आलेत. पण हा चित्रपट वेगळाय. त्यामुळे खऱ्या अर्थानं एक वेगळा राजकीय पट या निमित्तानं बघायला मिळेल.

रेटिंग : 3.5 स्टार