दहशतवाद्यांचा बिमोड, आता जंगलात घुसून नक्षल्यांच्या खात्म्यासाठी अमित शाहांचा प्लॅन

| Updated on: Aug 19, 2019 | 5:27 PM

नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठकही गृहमंत्रालयाने बोलावली आहे. 26 ऑगस्टला होणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांच्याही मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलंय. पण छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अजून निमंत्रण स्वीकारलेलं नाही.

दहशतवाद्यांचा बिमोड, आता जंगलात घुसून नक्षल्यांच्या खात्म्यासाठी अमित शाहांचा प्लॅन
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करुन केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा बिमोड (Naxal affected states) करण्याची पूर्ण तयारी केली आहे. भारतात दहशतवादी पाठवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचाही चांगलाच समाचार घेतला जातोय. आता अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांचा (Naxal affected states) नंबर आहे. गृहमंत्रालयाने यासाठी पुढचं पाऊल ठरवलंय. नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठकही गृहमंत्रालयाने बोलावली आहे. 26 ऑगस्टला होणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांच्याही मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलंय. पण छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अजून निमंत्रण स्वीकारलेलं नाही.

गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होणार आहे. नक्षलवाद्यांना मिळणारं बळ आणि स्थानिक पाठिंबा यावर सखोल चर्चा केली जाईल. नक्षलवाद्यांपर्यंत कोणतीही मदत जाऊ नये, नक्षलग्रस्त भागात हिंसाचार होऊ नये यासाठी अमित शाह स्वतः संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. नक्षलवाद्यांना पैसे मिळू नये आणि शस्त्र जप्त करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याबाबतही चर्चा होऊ शकते.

महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांसह इतर राज्यातही सतत नक्षलवादी कारवाया चालू असतात. पण आपल्याच देशात राहून हिंसाचार पसरवणाऱ्या या गटाला संपवण्यासाठी अमित शाह यांचं मंत्रालय सज्ज झालंय. केंद्राच्या निर्णयाला राज्य सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच सर्व संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

नक्षलवादी हल्ले आणि मृत्यू

गृहमंत्रालयाने जुलै 2018 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी कारवाया 2014 च्या तुलनेत 25 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्या 20 वर्षात नक्षल हल्ल्यांमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त निष्पाप लोकांचे जीव गेले, तर सुरक्षा बलाचे 2700 कर्मचारी-अधिकारीही शहीद झाले. नक्षलवाद्यांच्या 90 टक्के कारवाया फक्त 35 जिल्ह्यांमध्ये होतात, तर 10 राज्यातील 68 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याचंही गृहमंत्रालयाने सांगितलं होतं.

दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलच्या माहितीनुसार,

  • 2010 मध्ये 482 नक्षलवादी हल्ले झाले, ज्यात 1194 मृत्यू झाले.
  • 2011 ला 302 हल्ले, 606 मृत्यू
  • 2012 ला 234 हल्ले, 374 मृत्यू

2018 नंतर नक्षलवादी हल्ल्यांचं प्रमाण कमी झालं. पण तरीही अनेक मोठे हल्ले नक्षलवाद्यांनी केले.

महाराष्ट्रातील नक्षल प्रभावित जिल्हा गडचिरोलीमध्ये 2010 मध्ये 22 हल्ले झाले, ज्यात 43 जणांना जीव गमवावा लागला.

  • 2011 ला 30 हल्ल्यात 65 जण
  • 2012 ला 19 हल्ल्यात 36 जण
  • 2013 मध्ये 15 हल्ल्यात 43 जण
  • 2014 मध्ये 16 हल्ल्यात 30 जण
  • 2015 मध्ये 13 हल्ल्यात 16 जण
  • 2016 मध्ये 18 हल्ल्यात 24 जण
  • 2017 मध्ये 16 हल्ल्यात 24 जण
  • 2018 मध्ये 15 हल्ल्यात 58 जण
  • आणि 2019 ला जुलैपर्यंत 9 हल्ल्यात 20 जणांनी जीव गमावलाय.

गडचिरोलीत महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी लावलेल्या भूसुरुंगात अनेक पोलिसांचा मृत्यू झाला होता. अनेक निष्पाप लोकांचाही नक्षल्यांकडून अत्यंत अमानुषपणे छळ करुन हत्या केली जाते. या सर्व गोष्टींवर गृहमंत्रालयाने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी धोरण आखलंय. त्यामुळे राज्य सरकारच्या मदतीने नक्षलवादी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी अमित शाह यांचं मंत्रालय काय करतं त्याकडे लक्ष लागलंय.